सेतू को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी स्थापना

Setu Annual function 1985

समाजसेवेची स्फूर्ती मी, वडील आप्पा, यांचे कडून घेतली. आपला शिक्षकी पेशा सांभाळून, त्यांनी, शिकवण्या करूनही विद्यादानाचे पवित्र काम केले केले. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसा घेतला नाही .त्याचप्रमाणे,1950 च्या दशकात ,सरकारी उपक्रम, प्रौढसाक्षरता, या कार्यक्रमातही महत्त्वाचे,विनामूल्य, योगदान दिले.त्याकरिता, बोर्डीच्या आदिवासी पाड्यावर, रात्रीच्या वेळी, मुलांच्या शिकवण्या आटोपल्यावर जाऊन त्यांना साक्षर करण्याचे काम, विनावेतन केले आणि.  आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही,हिराजी मामान् बरोबर,  प्रौढ आदिवासींना  शिकविण्याचे काम करीत.  रात्री बारा वाजता घरी येऊन झोपत व पुन्हा सकाळी उठून, शाळेच्या वर्गावर रुजू होत. हे सर्व मी पहात असे मात्र त्यांना काही सांगण्याचे माझे वय नव्हते तेवढी समजही नव्हती.आप्पा हे विनावेतन करीत असतात हे आता समजते, कारण त्यावेळी आईचे उद्गार” लष्कराच्या भाकऱ्या भाजून काही उपयोग आहे का, त्यापेक्षा तब्येतीची काळजी घ्या..” त्यावेळी आप्पा म्हणत’ ” आपण या लोकांचे कोठेतरी देणेकरी लागत आहोत, तेव्हा त्यांचेसाठी, थोडेफार कष्ट करायला काय हरकत आहे?..हे सर्व आठवणीत आहे. त्या कोवळ्या वयात कुठेतरी एक अस्पष्ट जाणीव झाली की,आपणही आपल्या भोवतालच्या समाजाचे कोठेतरी देणे लागत असतो आणि त्यासाठी थोडे कष्ट घ्यायला पाहिजेत नव्हे ते आपले कर्तव्य ही असते.

         दादरच्या,कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात, विद्यार्थी म्हणून रुजू झाल्यापासून, त्यावेळी तेथे तन-मन-धनाने समाजासाठी काम करणाऱ्या, चिंतामणराव वर्तक, मामासाहेब ठाकूर ,भाई राऊत ,रामभाऊ चुरी ,शांताराम जी पाटील,बाबुराव सावे व इतरही बरीच मंडळी यांचे काम, मी खूप जवळून पहात असल्याने, आपल्यालासुद्धा आपल्या समाजासाठी, तरी थोडे योगदान  देता आल्यास ते सार्थ होईल ही भावना मनात दृढ झाली.वसतिगृहाचा रेक्टर ,व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी देऊन तत्कालीन विश्वस्तांनी मला एक चांगली संधी दिली व माझाही शिरकाव ,सामाजिक कार्यामध्ये अशा रीतीने झाला. पुढे विश्वस्थ व कार्यकारी विश्वस्त म्हणून बारा वर्षे काम करून मी माझ्या समाजाला ,थोडीफार सेवा, यथाशक्ति दिली.

      समाजासाठी काम करताना माझे काही विचार होते. त्यातील मुख्य म्हणजे,आपले कार्यक्षेत्र ‘सोमवंशीय क्षत्रिय समाजापुरतेच मर्यादित असावे’,कारण, आपली नोकरी व्यवसाय सांभाळून, कार्याचा परीघ विस्तारणे मला शक्यच नव्हते .तसेच,या समाजाने मला ,माझ्या शिक्षण कालांत, आर्थिक मदत व वसतीगृहात  निवासस्थान दिल्यामुळे या समाजाचे निश्चितच मी देणे लागत होतो.  त्याअनुषंगाने आपल्या  सोमवंशी क्षत्रिय समाज उन्नती संघाच्या या विविध अंगामध्ये ,थोडेफार योगदान देऊन मी समाधानी होतो.

        आर्थिक क्षेत्रात  आपण काही काम करू, अथवा आपण अशा क्षेत्राशी कधी संबंधित होऊ  असे कधीच वाटले नाही. कारण  या विषयाचा माझा अभ्यास व वाचन नाही .नोकरी पेशा मुळे,  ज्या  काही आर्थिक  बाबी सांभाळाव्या लागल्या तेवढे  काम केले .मात्र तेथेही ही हाताखाली स्वतंत्र अकाउंटंट्स वा कॉमर्स चे पदवीधर असत त्यामुळे त्यांचेवर देखरेख ठेवणे मात्र व्यवस्थित जमत असे. माझा स्वतःचा आर्थिक ताळेबंद ही मला नीट ठेवता आलेला नाही !!सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटी बहुतांशी , आर्थिक व  कार्मिक  गोष्टीशी च स॔लग्न असल्यामुळे  मी ,या कामांत,जरी सहभागी झालो,  तरी  एक व्यवस्थापक असाच माझा दृष्टिकोन असे. तरी देखील सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेमध्ये मी का व कसा सहभागी झालो आणि आणि सोसायटीचा पहिला अध्यक्ष म्हणून काम पाहून ,आजही सोसायटीच्या सल्लागार मंडळावर,थोडे योगदान देत आहे .ती मोठी गमतीशीर आणि योगायोगाची गोष्ट आहे .

       असे झाले की ,1984च्या साधारण मार्च-एप्रिल महिन्यात, श्रीयुत गोपिनाथ वर्तक,या आमच्या मित्रांनी एके दिवशी आम्हा 11 सहकाऱ्यांना, श्रीयुत जयवंत  म्हात्रे, यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी, एका  चर्चेसाठी  येण्याचे निमंत्रण दिले. गोपीनाथ रावांनी  कशासाठी जमत आहोत त्याचा थोडासा  अंदाज दिला होता .मात्र आम्ही प्रत्यक्षात, ज्या दिवशी दुपारी,जयवंतराव म्हात्रे यांच्या घरी जमलो, त्यादिवशी गोपीनाथ, संपूर्ण तयारीनिशी आलेले होते.त्यांनी  एका ,को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या स्थापनेचा, संपूर्ण आराखडा  तयार करून आणला होता.त्या आराखड्यात,अगदी “सेतु “या क्रेडिट सोसायटीच्या नावापासून, ते ,किती व कोणत्या सरकारी मान्यता या घ्याव्या लागतील, सोसायटीचे कार्यक्षेत्र ,पुढील सर्व कामाची एकूण रूपरेषा, कर्ज वाटप संबंधी नियम,देणग्या  व डिपॉझिट गोळा करण्याची मानके,तसेच उपस्थित  प्रत्येक मित्रांने,  काय योगदान देणे अपेक्षित आहे,अशी सर्व माहिती अगदी तपशीलवारपणे लिहून, एक अहवालच तयार केला होता. त्यासाठी त्यांनी स्वतः ,काही क्रेडिट सोसायट्यांच्या कार्यालयांना भेट देऊन व त्यांच्या निर्देशक ,अध्यक्ष ,आदी,  उच्चपदस्थांना प्रत्यक्षात भेटून, त्यांच्या सूचना,माहिती चा विचार करून ,हे टिपण तयार केले होते .खूपच अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध  काम पाहिल्यावर, आम्हाला त्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकताच वाटली नाही. विशेष बाब म्हणजे,त्या  सुमारास म्हणजे साधारणतः ऐंशीच्या दशकापर्यंत, आमच्या समाजातील एक तरुण बँकर,श्री. हेम॔त चौधरी ,यांच्या पुढाकाराने  वसईमध्ये नुकतीच, “वसई विकास सहकारी बँक”, सहकार क्षेत्रात सुरु झाली होती. त्याच  उपक्रमाला पूरक म्हणून ,अशी एखादी क्रेडीट सोसायटी निर्माण झाल्यास,आमच्या समाजातील गरजूंना,विशेषतः तरुण विद्यार्थी, उद्योजकांना ,याचा भविष्यात अतिशय फायदा होईल, हे आम्ही आमच्या अनुभवावरून व आम्हाला अभ्यास कालांत जाणवलेल्या अडचणी वरून ,ओळखले. म्हणून त्या प्रस्तावाला सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन, या कामात झोकून देण्याचे ठरविले. गोपीनाथ भाईंना सर्वांनीच धन्यवाद दिले .एका चांगल्या कामाला सुरुवात केल्याबद्दल प्रत्येकाने ,आता मागे हटायचे नाही,अशी खूणगाठ ही मनाशी बांधली. आणि खरोखरच पुढील कालखंडात आम्ही सर्वांनी आपला उद्योग व्यवसाय ,नोकरी, कुटुंब हे सर्व सांभाळून या कामाला वाहून घेतले. म्हणूनच सेतु क्रेडिट सोसायटीची नुसती स्थापना झाली नाही, तर सेतुचा विस्तार दिवसेंदिवस अधिकच होत गेला, आणि अजूनही होतो आहे.  सुट्टीच्या दिवशी, प्रत्येक रविवारी व कधी अगदी  रात्री अपरात्रीही , घरोघरी फिरून, चर्चासत्रे  आयोजित करून  एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून,काम करु शकलो.दिवसेंदिवस सेतु प्रगतीपथावर गेली, आजही जात आहे व भविष्यातही वृद्धिंगतच होणार ही आशा आहे. सेतुचे काम करीत असताना ,एक उमेद मनाला उभारी देत असे ..आमच्या समाजात, एका ऐतिहासिक कामाला, अगदी प्रथमतः प्रारंभ होत आहे, आणि , हे काम यशस्वी केले तर,भविष्यातील आमचा समाज,  शैक्षणिक ,औद्योगिक, सामाजिक, व आर्थिक क्षेत्रात, एक  वेगळी  ओळख  इतरांपुढे ठेवणार आहे. आणि सर्वात  महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या “न भुतो …”,अशा ऐका महान घटनेचे, केवळ साक्षीदारच नव्हे, तर संस्थापक सदस्य असणार आहोत ,ही खूप मोठी प्रोत्साहित करणारी गोष्ट,आमचा हौसला सतत वाढवीत होती.त्यामुळेच संसारिक ,कार्यालयीन,  व  सामाजिक विरोध अशा अडचणींचे अनेक डोंगर  पार करताना,आमची उमेद  कमी झाली नाही.

एक मे 1984 रोजी सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची रीतसर स्थापना करून सरकार दरबारी नोंद करण्यात आली…आणि” सेतू को क्रेडिट सोसायटी”.. नावाचे हे इवलेसे रोप ,आम्ही सोमवंशी क्षत्रिय समाज बांधवांच्या द्वारी लावियले ….

  सुरुवातीला आम्ही अकरा सदस्यांनी आमच्या दहा रुपयाच्या प्रत्येकी शेअर प्रमाणे,उभ्या केलेल्या,फक्त  पंचवीस हजार रुपये भांडवलातून,आज शंभर कोटी पेक्षा जास्त, उलाढाल करणारी सेतु को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची भव्यता पाहिली की मन एका सात्विक समाधानाने भरून येते..”याच साठी केला होता अट्टाहास..” असे अंतरीचे बोल  मनामध्ये आपोआप उमटतात …

    सेतू च्या गेल्या छत्तीस वर्षांतील नेत्रदीपक वाटचालीची थोडक्यात,झलक अशी.. 

साल सभासदभाग भांडवल रु.ठेवी.रुनफा रु.
984/854221 लाख    25,0002500
2019/2010,2345.1 कोटी113 कोटी1.2 कोटी
Progress made

         गत आर्थिक वर्षात,’सेतू’चे खेळते भागभांडवल सुमारे 134 कोटी रुपयांच्या घरात असून, जवळ जवळ 80 करोड रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे, आणि एवढा भव्य कारभार असूनही ,सेतू क्रेडिट सोसायटीने, सुरुवातीपासून ते आजतागायत,”अ” हा लेखा परीक्षण वर्ग (Audit Report),कायम राखलेला आहे. ही खरोखरच स्पृहणीय अशी गोष्ट असून ,सेतूच्या सर्व सभासदांना ,आजी-माजी निर्देशक ,व अध्यक्षांना ही भूषणावह अशी बाब आहे.   

         आर्थिक पाठबळ, ही, आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट आहे,  हे ज्यांनी,अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले ,त्यांना सांगावयास नको.आम्ही सर्व अकरा सहका-यानी  ,अशा परिस्थितीचा  मुकाबला  एकेकाळी केला होता. ही प्रतिकुलता,आमच्या भावी पिढ्यांना सहन करावी लागू नये,हा ही एक प्रामाणिक हेतू, या आर्थिक संस्थेची उभारणी करण्या मागे होता. आजच्या काळात,कोणत्याही शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक ,वा राजकीय  क्षेत्रात अग्रेसर असलेल्या, प्रगत समाजाकडे पाहिल्यानंतर,  त्यांच्यामागे , स्वतःच्या  आर्थिक  आस्थापना चे  भरपूर  पाठबळ  असते हे, प्रकर्षाने निदर्शनास येते. आमच्या  मागील  समाजधुरीणांनी  अनेक  चांगल्या  उपक्रमांना  सुरुवात करून दिली  होती मात्र अशा प्रकारचे  एखादे आर्थिक आस्थापन ही  निर्माण केले गेले असते,तर  आपला समाजही आज आहे त्याहून अधिक प्रगतीशील राहिला असता.  विशेषतः शेती व शेतीला पूरक ,अशा काही जोडधंद्याचे निर्माण, आमच्या शेतकरी समाज बांधवांना करणे सोपे गेले असते, असे नम्रपणे वाटते.आर्थिक क्षेत्रात विशेषतः सहकारी आर्थिक क्षेत्रात,आज-काल बोकाळलेला भ्रष्टाचार पाहिल्यानंतर, मन नाराज होते. परंतु आजपर्यंत सेतुची वाटचाल व विस्तार पाहिल्यानंतर, कोठेतरी आशेचा किरण निश्चित दिसतो.आपली ही आर्थिक पतपेढी ,महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये, एक आदर्श आर्थिक संस्था म्हणून नावाजली जावी ,अशी,आम्हा संस्थापकांची मनिषा, सफल होत आहे, हे पाहून खूप समाधान वाटते. आजच्या युगात ,सेवा, समर्पण ,त्याग, या शब्दांचे संदर्भ बदललेले असताना, अशा विशिष्ट मूल्य कल्पना उराशी बाळगणाऱ्या, एका संस्थेची  उभारणी करून,आमच्या नंतर ते सेतुचे नेतृत्व ही,त्याच मार्गाने, वाटचाल करीत आहे हे पाहतांना ऊर भरून येतो.आज सेतु ,हे एक मोठे कुटुंब बनले आहे.  विविध क्षेत्रांमधील गरजूंनी,सेतु मधून आर्थिक मदत घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यावरून अशा एका समाज संस्थेची किती आवश्यकता होती हे सिद्ध होते.

           गोपीनाथ भाईंच्या नेतृत्वाखाली, आम्ही सहकाऱ्यांनी ही एक गरुड झेप घेतली .मी या सर्व सहकाऱ्यांचा मनःपूर्वक आभारी, कारण त्यांनी मला या आर्थिक व सहकार क्षेत्राचा विशेष अभ्यास नसूनही ,सामावून घेतले एवढेच नव्हे तर पहिल्या चार वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून मोठ्या सन्मानाने माझी नियुक्ती केली.

     सन 1984ते 1988 अशी चार वर्षे मी  सेतुचा पहिला अध्यक्ष, म्हणून काम पाहिले.माझे सहकारी श्रीयुत गोपीनाथ वर्तक  हे त्यावेळी,  सेतुचे  पहिले कार्यवाह,असल्याने,माझे काम खूपच सोपे झाले.संस्था अगदी बाल्यावस्थेतच असल्यामुळे आमचे  दैनंदिन काम विशेष दिसत नव्हते.रोजचे कार्यालयीन काम  जास्त नव्हते.सदस्य  नोंदणी करणे,सेतु साठी डिपॉझिट जमविणे,  त्याचप्रमाणे  सरकार दरबारी काही  नोंदी करणे, इत्यादी  प्रारंभिक महत्त्वाची अशी कामे भरपूर होती. संस्थेच्या एकूणच कारभाराला ,पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ,काही निश्चित मानदंड तयार व्हावेत, ही देखील आमची महत्त्वाची जबाबदारी होती.  व्यवस्थापन व व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष  अनुभव, या माझ्या शक्तीस्थानामुळे  संस्थेचे व्यवस्थापन चोख ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा हातभार लावला. आर्थिक व्यवहार करताना कोणतीच तडजोड केली जाणार नाही हे देखील कटाक्षाने पाहिले. त्यासाठी खालील तीन पथ्ये  आम्ही  पाळली: 

      एक ,सेतुकडून  मिळणारी मदत  ही ,खरोखरीच गरजवंत  व होतकरू  सदस्याला मिळावी. विशेषेकरून  विद्यार्थ्यांना त्यात  अधिक वाव असावा.

      दोन,अशा रितीने  कर्जाचे वाटप करताना  एखाद्या  गरजवंताची  विनंती,  केवळ  काही तांत्रिक अडचणीमुळे  नाकारली जात असेल ,तर त्यावेळी,  नियम थोडा बाजूस ठेवून ,अशा  सदस्याला , विशेषतः  विद्यार्थ्याला कर्ज रुपी मदत व्हावी .

       नंबर तीन ,सेतु ही ,केवळ कर्जे वाटणारी व डिपॉझिट गोळा करणारी  संस्था न राहता खऱ्या अर्थाने, आपल्या  नावाप्रमाणे,समाजबांधवांची मने जोडणारा तो एक  दुवा व्हावा अशा प्रकारचे, इतरही काही उपक्रम राबविणे.

     सुदैवाने कार्यवाह, व माझे सर्व निर्देशक  सहकारी  यांचे  याबाबत एकमत झाल्यामुळे,आम्ही ही  धोरणे संपूर्णपणे व यशस्वी करू शकलो, हे नमूद करण्यात खूप आनंद वाटतो.सुरुवातीच्या सात-आठ वर्षा पासूनच सेतु सोसायटीने आपली आर्थिक उलाढाल वाढवित नेतांना चोख कारभार  व  उत्तम   दर्जा ,यामुळेच,  आपल्या कामाचा एक दबदबा निर्माण केला आहे. 

           विशेषतः गृह खरेदी  अथवा औद्योगिक  आस्थापने,यांच्या साठी,कर्जे मंजूर करताना,आम्हाला दक्ष राहावे लागे.  त्याकाळी आणि आजही, आर्थिक संस्था डबघाईला येण्याचे मुख्य कारण म्हणजे ,अध्यक्ष व निर्देशक यांनी आपल्या ओळखीच्या  व नातेसंबंधांतील सदस्यांना कर्ज वाटप करून,वसुलीबाबत ढिलाई करणे  हेच आहे. मला नमूद करावयास खरोखर अभिमान वाटतो ,आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याबाबतीत स्वतःच एक मानदंड निर्माण करून,  स्वतःवर बंधने घालून ,अशा प्रकारचे संशयास्पद  कर्ज वाटप ना स्वतःला ,वा मित्रांसाठी होऊ दिले.माझे काम त्यामुळे खूपच सोपे झाले.

          सेतु ही ,समाजातील एक बहुआयामी संस्था म्हणून नावारूपास यावी, या बाबतीत देखील  अध्यक्ष म्हणून  मी  केलेल्या  सूचनांचा विचार  सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत  सकारात्मक दृष्ट्या  विचारात घेऊन  त्याप्रमाणे संपूर्ण सहकार्य दिलेले आहे.  म्हणूनच  आज अत्यंत प्रभावी ,उपयुक्त ,लोकप्रिय असा सेतुच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, मोठ्या दिमाखात ,दरवर्षी होत असतो.त्यादिवशी ,एखाद्या मराठी नाटकाचा नाट्यप्रयोग आयोजित करावा व समाजांतील  होतकरू  विद्यार्थ्यांचा  गौरव करून, विशेष  कर्तृत्व दाखविणाऱ्या  समाजबांधवांचा ही सन्मान व्हावा,  एखाद्या मान्यवरांकडून  प्रबोधन व्हावे,  अशी ही कल्पना होती. या दरवर्षीच्या प्रथेमुळे,श्री.  माधव गडकरी,त्यावेळी लोकसत्तेचे संपादक, श्री. सुधीर फडके प्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक, श्री. पेंढारकर विको वज्रदंती चे उत्पादक उद्योजक ,कवी शंकर वैद्य ,श्री .गजानन खातू व श्री .शिरीष देशपांडे, हे ग्राहक सहकारी  चळवळीचे अध्वर्यु ,अशी मोठी विद्वान व कर्तृत्ववान मंडळी आमच्या या संमेलनात सहभाग देऊन गेली. त्यामुळे एक सुंदर स्नेहसंमेलन तर होई,नाटकाच्या तिकिट विक्रीमुळे , आर्थिक हातभार लागे . माझे, सर्वप्रथम होणाऱ्या प्रास्ताविक भाषणात , मी,केलेल्या आवाहनानुसार काही दानशूर समाजबांधव सेतुसाठी आपल्या देणग्या व  ठेवी  जाहीर करीत. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य  म्हणजे,  त्यावेळचे,आमच्या समाजातील प्रसिद्ध  उद्योगपती,सहल सम्राट श्री.  राजाभाऊ पाटील , यांचेकडून आम्हाला मिळालेले  उत्तेजन व त्यांचा सक्रिय सहभाग! प्रत्येक कार्यक्रमाआधी  राजाभाऊंच्या दादर येथील प्रशस्त व सुंदर कार्यालयात  आमच्या बैठका होत.  राजाभाऊ कार्यक्रम आखणी व प्रस्तुतीकरण यादृष्टीने, काही सूचना करीत. कार्यक्रमाचे दिवशी प्रत्यक्ष जातीने हजर रहात.राजाभाऊंची मला प्रेमाची सक्त ताकीद असे की” दिगंबर तुझे प्रास्तविक भाषण जोरदार झालेच पाहिजे, त्यामुळे उपस्थितांची,एक सकारात्मक मानसिकता तयार होऊन आपल्या ठेवी संकलनाच्या कार्यक्रमाला मदत होईल.”..तसेच होई.सुरुवातीलाच राजाभाऊ, आपली देणगी व ठेवी चा आकडा जाहीर करीत. त्यामुळे  तेथे उपस्थित इतर समाज बांधवांना ही स्फूर्ती मिळून,त्यांचेकडूनही आम्हाला भरघोस मदत व ठेवी मिळण्यास मदत होत असे. आजचा,सेतुचा व्याप  व यश पाहून, राजाभाऊंना निश्चितच खूप आनंद झाला असता.दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. मात्र आजच्या सेतुच्या  यशांत , राजाभाऊंचे  मोठे योगदान आहे, हे आम्हाला मान्य करावे लागेल.

   सन्माननीय, डाॅ.बळवंतराव पाटील, आमच्या सोमवंशी क्षत्रिय  समाजोन्नती संघाचे अध्यक्ष होते.त्यांनीही आम्हाला सुरवातीचे काळांत खूप प्रोत्साहन दिले आहे. अनेक प्रसंगी, त्यांच्या पार्ले स्टेशन जवळील दवाखान्यात, आमच्या बैठका, सभा झालेल्या आहेत. डॉक्टर एक द्रष्टे नेते होते आणि त्यांचा देखील ,सहकार चळवळीचा खूप अनुभव व अभ्यास होता. डॉक्टर आमच्या वार्षिक कार्यक्रमात जातीने हजर असत, आर्थिक मदत देत, व इतरही वेळा आमचे कौतुक,समाजाच्या व्यासपीठावरून करीत असत. त्यांच्या स्मृतीला ही या निमित्ताने मी अभिवादन करतो.

  सन्माननीय केसरीभाऊ पाटील यांचेही आमच्या सेतु सोसायटीच्या  वाटचालीत मोठे योगदान आहे.आज केसरीभाऊ , प्रकृती अस्वास्थ्यामुळे,प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसले, तरी गेली कित्येक वर्षे त्यांचे मौलिक मार्गदर्शन व आर्थिक मदत कोणत्या ना कोणत्या रूपाने संस्थेला होत असते. त्यांचाही  येथे मी आदरपूर्वक नामोल्लेख करतो.

      आमच्या समाजातील मालाड येथे राहणारे, उद्योगपती कै. वासुदेव राऊत यांनीही ,सेतुच्या प्रारंभीच्या काळात, संस्थेला आर्थिक पाठबळ मिळविण्याच्या दृष्टीने, मोलाचे सहकार्य केले आहे. ही त्यांचीआठवण संस्था निश्चित ठेवील.

      माझ्या अध्यक्षीय कालखंडात व त्यानंतरही, एक गोष्ट  मी,  काळजीपूर्वक सांभाळली. सोसायटीचा एक संस्थापक सदस्य ,व अध्यक्ष म्हणून,माझ्याकडून कोणालाही सभासद होण्याबाबत डिपॉझिटस्, देण्याबाबत, वा कर्ज वाटपासाठी शिफारस यात,मी कधीही आग्रही राहीलो नाही. आर्थिक संस्थेमध्ये, आपल्यामुळे, दुरान्वयेही अशा प्रकारचे व्यवहार झाले,व त्यामुळे संस्थेला थोडीतरी आर्थिक हानी झाली तर ते मला पटण्यासारखे नव्हते. कारण अध्यक्ष म्हणून ,ही बंधने  पाळणे आवश्यक होते व मागे सांगितल्याप्रमाणे आर्थिक संस्था बुडण्याचे एक मुख्य कारण सूत्रधारांनीच केलेले  नियमबाहय   वर्तन,व सुरु केलेले वाईट पायंडे, हेच असते.पुढे काही वर्षांनी, सेतूच्या एका शाखेमध्ये झालेले, काही गैरव्यवहाराचे प्रकरण  पाहिल्यानंतर ,मला वाटते , माझा  निर्णय योग्य होता.

         माझ्या शिवाय ,ज्या दहा  संस्थापक सदस्यांनी, एकत्र येऊन, मे 1984 साली, सेतु क्रेडिट सोसायटीची स्थापना केली ,त्या प्रत्येकाबद्दल थोडक्यात माहिती इथे देणे, मी उचित समजतो.

   श्री गोपीनाथ जगन्नाथ वर्तक ,मूळ गाव चटाळे ,बोरीवली. सेतु क्रेडिट सोसायटीचे प्रवर्तक,व ज्यांच्या विचारमंथनातून सेतुच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली, ते, सेतुचे चे संस्थापक सदस्य. महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातून व्यवस्थापक ,या पदावरून निवृत्त झाले.आपल्या या परिसरांतील व परिसराबाहेरही, समाज बांधवांबद्दल असलेल्या तळमळीतून ,त्यांनी सेतु च्या स्थापनेचा आराखडा तयार केला. इतर 10 सहकाऱ्यांची निवड करून सेतुच्या निर्मिती कार्याला सुरुवात केली. 1984 पासून ते मधली काही वर्षे सोडता, आजतागायत ते संस्थेत  कार्यवाह, अध्यक्ष सल्लागार, अशा कोणत्या ना कोणत्या ,रीतीने सतत संबंधित आहेत.  सध्या आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्ट, चे मुख्य विश्वस्त आहेत.

     सदानंद म्हात्रे मूळ गाव केळवे,वास्तव्य गोरेगाव.महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास  महामंडळातून, उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य व संस्थेच्या अगदी सुरुवातीपासूच्या जडणघडणीत ,सहभागी. संचालक 1984 ते 88,उपाध्यक्ष 1988 ते 91,अध्यक्ष 1991 ते 96.  सेतुच्या सुरुवातीपासून ते आजतागायत, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना त्यांनी,भाग भांडवल व ठेवी गोळा करणे, त्याचप्रमाणे,सेतुला जागा खरेदीसाठी बिनव्याजी आर्थिक मदत,व जाहिराती मिळवणे, यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सेतुच्या  सुरुवातीच्या, अत्यंत बिकट अशा कालखंडात,आम्ही जमा केलेल्या सर्व आर्थिक शक्तीमध्ये,  सदानंद भाईंचा  एकट्याचा,  पन्नास टक्क्याहून अधिक हिस्सा होता, हे सांगितल्यावर त्यांनी  त्या वेळी केलेल्या  कामाचा  आवाका लक्षांत येईल. विशेष म्हणजे ,शरीराची साथ नसतानाही, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ,त्यांनी हे काम केलेले आहे. ते समाजोन्नती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते व तेथेही आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे अध्यक्षीय  कालांत, बोरिवली पश्चिम येथील  51 व्या रस्त्याला,  लोकनेते अण्णासाहेब वर्तक मार्ग असे नामाभिधान   करविण्यांत ,सदानंद भाईंचा सिंहाचा वाटा आहे ,हेही येथे मुद्दाम नमूद करतो. ते माझे एक चांगले मित्र व सहकारी.

      श्री जयवंत भाऊराव म्हात्रे,भारतीय रिझर्व बँके मधून ,मुख्य महाप्रबंधक पदावरून सेवानिवृत्त.सेतू चे संस्थापक सदस्य. सहकार्यवाह 1984 ते 1986, 2006 ते 2011अध्यक्ष.’समाजाचे आपण देणे लागतो’ या भावनेने ,निरपेक्षपणे काम करणारी एक व्यक्ती. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्था. उपाध्यक्ष. केळवा रोड विभागीय विकास समिती उपाध्यक्ष.सेतुच्या रौप्यमहोत्सवी समारंभात अध्यक्ष म्हणून मोठे योगदान.आजही सेतुची वाटचाल लोकशाही तंत्राने व्हावी, यासाठी सदोदीत प्रयत्नशील असतात.

    श्री बाबुराव शंकर राऊत ,मूळ गाव एडवण.वास्तव्य वसई.भारतीय रिझर्व बँकेतून असिस्टंट मॅनेजर या पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य. संयुक्त कोषाध्यक्ष 1984 ते 88,कोषाध्यक्ष 1989 ते 96, उपाध्यक्ष 1996 ते 2001 .विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून अध्यक्षपदावरून जून 2002मध्ये निवृत्त झाले. सल्लागार समिती सदस्य व सेतुच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा व सल्लामसलत याद्वारे क्रियाशील .

     श्री दत्तात्रय सखाराम सावे. मूळ गाव केळवे. सध्या वास्तव्य बोरिवली. माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट,मधून ते सेवानिवृत्त झाले. सेतुच्या जडणघडणीत मार्गदर्शक ,आधारस्तंभ म्हणून सदैव भूमिका निभावली. कोषाध्यक्ष 1984 ते 89 ,कार्यकारी सदस्य 1989 ते 91उपाध्यक्ष 1991ते 96 व अंतर्गत लेखापरीक्षक 96 ते 2002. अशी अठरा वर्षे विविध पदावरून,सेतुची आर्थिक घडी सांभाळण्याचे महत्त्वाचे योगदान.सल्लागार समितीचे सदस्य. सेतुचे कार्यालय होईपर्यंत, बहुतेक आर्थिक व्यवहारही त्यांच्या घरातूनच होत असत.पद असो वा नसो, सेतुचे हिशोब संकलन व तपासणी, याची जबाबदारी त्यांनी घेतली व तनमनधनाने ‘सेतुमय’  झालेले असे आमचे दत्ताभाऊ!

      श्री पंढरीनाथ का. सावे, मूळ गाव तारापूर. वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य व संचालक .1984 ते 1987 .स्वतःचा उद्योग’ मुंबई स्क्रीन प्रिंटिंग इन्स्टिट्यूट’, यशस्वीपणे चालविला.ऑल इंडिया स्क्रीन प्रिंटिंग असोसिएशनचे सदस्य. सेतुच्या सुरुवातीच्या वाटचालीत सक्रीय योगदान व सदैव सक्रिय पाठिंबा.

       डॉक्टर देवराव हिराजी पाटील, मूळ गाव चिंचणी . सध्या वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य. ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ विषयात डॉक्टरेट. पार्ले कॉलेजमधून, रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त .मुंबई युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य. पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे यशस्वी आयोजक.चिंचणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष .प्रिन्सिपल बी एम सावे शिक्षण संस्था व राऊत आयटीआय चिंचणी या संस्थांचे आद्य संस्थापक .अतिपूर्व भारताच्या विविध राज्यांतून मुलांना शैक्षणिक मदत करण्याचा वसा घेऊन ,कार्यरत आहेत. तीनशेहून अधिक नागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता त्यांनी साधली. सेतुचे उपाध्यक्ष 1984 88,अध्यक्ष 1988 ते 1991,  असे बहुआयामी व्यक्तिमत्व.

     डॉक्टर अशोक नारायण वर्तक,मूळ गाव माहीम, वास्तव्य विरार. सेतुचे संस्थापक सदस्य.भाभा अणुकेंद्र मुंबई ,येथून सेवानिवृत्त. सेतुमच्या पायाभरणी च्या काळात, संचालकाच्या भूमिकेतून, 84 ते 87 कालखंडात, भागभांडवल व ठेवी संकलनात शेतीच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग दिला.

      श्री.महादेव जीवन वर्तक, मूळ गाव एडवण. वास्तव्य बोरिवली ,मुंबई.महानगरपालिकेतून उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. समाजकार्याची मनापासून खूप आवड,त्यामुळे आपल्या गावातील व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे.सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे बारा वर्षे चिटणीस म्हणून काम केले. क्षात्र्यैक्य परिषदेचे, अध्यक्ष म्हणून काम केले.निधी संकलनासाठी त्यांची खूप मदत झाली.स्वभाव ,अत्यंत वक्तशीर आणि काटेकोरपणा, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. सेतुच्या संचालक पदावरून 1984 ते 87 या काळात, ठेवी संकलन, सभासद नोंदणी, इमारत निधी संकलन इत्यादी सर्व उपक्रमातून त्यांनी सेतूची सेवा केली आहे.

        कै.रवींद्र भास्करराव ठाकूर ,मूळ गाव शिरगाव. वास्तव्य विरारला असे. आमचे हे,आजपावेतो,एकमेव संस्थापक सदस्य ,ज्यांचे नावापुढे ‘कैलासवासी’लावण्यात अतिशय दुःख होते, मात्र ते सत्य आहे. माझे अतिशय चांगले मित्र आणि तात्यासाहेब चुरी वसतिगृहात माझे सहाध्यायी. मी तेथे रेक्टर असताना, मला दिलेली साथ व मोलाचा सल्ला,कायम स्मरणात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित,मधून व्यवस्थापक या वरीष्ठ पदावरून  सेवानिवृत्त झाले.सेतुच्या स्थापनेच्या  विचार प्रक्रियेत,  तेही सहभागी होते.संचालक या नात्याने 84 ते 87 सर्व बाबतीत मोलाचे सक्रीय सहकार्य. सेतुचे माजी उपाध्यक्ष, शिरगाव शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य, सेतुच्या वाटचालीत,   आमरण ,त्यांनी तत्परतेने सहभाग दिला. एक स्पष्टवक्ता, रोखठोक विचार मांडणारा, माणूस म्हणून कै. रवींद्र ठाकूर यांची नेहमी आठवण येत राहील. 

      या व्यतिरिक्त आणखीन दोन सहकाऱ्यांनी सेतुचे अध्यक्षपद सन्मानाने भूषविले आहे त्यांचेबद्दल ही थोडक्यात सांगतो

   श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील, बोर्डी, बोरीवली.बी.कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर, प्रमोद भाईंनी बँकिंग क्षेत्राची निवड केली. या क्षेत्रातील एक जाणकार म्हणून समाजात त्यांचे नाव आहे.सेतु सोसायटीच्या  पहिल्या कार्यकारी मंडळात, अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून अतिशय उत्तमपणे प्रमोद भाईंनी काम केलेले आहे . सन 2001 ते 2006 ,सेतुचे अध्यक्ष होते. आजही ते सेतुच्या संचालक मंडळात असून अगदी स्थापनेपासून सेतुसाठी त्यांचे योगदान वादातीत व अतिशय मोलाचे असे आहे. त्यांच्याच अध्यक्षीय कालांत ,बोर्डी चिंचणी या महत्त्वाच्या शाखा उघडण्यात आल्या व यशस्वीपणे कार्यरत झाल्या. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड,M S E B., बिलांचा भरणा करण्याचे काम ,सेतुच्या विविध शाखांतून, त्यांनीच सुरू केले.त्यामुळे सोसायटीला एक नवीन उत्पन्नाची बाब निर्माण झाली व काही समाज युवक-युवतींना नोकऱ्याही मिळू शकल्या. अत्यंत मीतभाषी, मात्र गरज पडल्यास अगदी स्पष्ट व सडेतोडपणे आपले विचार मांडणारे. विशेषतः सद्य परिस्थितीत,अध्यक्ष श्री गोपीनाथ वर्तक यांनी,  वैयक्तिक कारणामुळे,दिलेल्या राजीनाम्याने निर्माण झालेली  परिस्थिती, अत्यंत यशस्वी पणे हाताळण्यात,त्यांनी  हंगामी अध्यक्ष  श्री.  पुरुषोत्तम वर्तक,  यांना दिलेली साथ  खूप मोलाची आहे . प्रमोद भाई आमच्या तात्यासाहेब चुरी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून  आज काम पाहत आहेत.

    श्रीयुत जगन्नाथ म्हात्रे, केळवे, सध्या वास्तव्य बोरिवली. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधून सेवानिवृत्त. सेतु क्रेडिट सोसायटीशी प्रारंभापासून निगडित असून, उत्तम प्रकारे काम केले आहे.2011_2016, या कालखंडात सेतुचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली जयवंत म्हात्रे व जगन्नाथ म्हात्रे या बंधुद्वयानी, सेतु सोसायटीचे इतिहासात अध्यक्षीय कामगिरी करून, विक्रमच केला आहे.

    श्री पुरुषोत्तम विठोबा वर्तक, केळवे-माहीम ,बोरिवली. मुंबई महापालिकेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त.  ‘महानगरपालिका शिक्षण विभाग बँकेत’ पदाधिकारी, म्हणून अनेक वर्षे कामाचा अनुभव.सेतुशी त्यांचा अनेक वर्षांपासून संबंध असून अनेक प्रकारे त्यांनी सेतुची सेवा केली .सध्या ‘सेतु क्रे.सोसायटीचे उपाध्यक्ष,असून अध्यक्षांच्या अकाली राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यांच्या कडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळवून,, हंगामी अध्यक्ष म्हणून ही धुरा वाहत आहेत.उत्तम वक्ते व सर्व समावेशक स्वभाव यामुळे एक चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिका, “आदर्श शिक्षक, महापौर पुरस्कार”, तसेच’ महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक’,राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

श्री श्रीकांत राऊत यांनीही सोसायटीच्या कामांत मोठे योगदान दिलेले आहे 1996 ते 2001 या काळांत ते विकास समिती या मुख्य समितीचे अध्यक्ष होते. त्याआधी पाच वर्षे 1991 ते 96 ,असे विकास समिती सदस्य देखील होते.ही समिती सेतूच्या एकंदर कार्यप्रणालीची रूपरेषा,कर्जांचा परतावा व एकूणच सर्व ध्येय धोरणांचे बाबतीत निर्देशक मंडळाला ,  BOARD OF DIRECTORS, मार्गदर्शन व शिफारस करण्याचे काम करते.

      

वरील सर्व सहकाऱ्यांची त्रोटक माहिती वाचल्यानंतर, ज्या मित्रांचा,बांधवांचा त्यांच्याशी कधीतरी संबंध आला असेल ,ते निश्चितपणे जाणतील की, ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात कार्यतत्पर, अनुभवी, ज्ञानी तर होतीच पण विशेष म्हणजे, चारित्र्य संपन्न होती.त्यामुळेच, अशा आर्थिक संस्थेची जबाबदारी पेलताना, माझ्या अध्यक्षीय काळात,सर्वांची मला खूपच मदत झाली. सेतुच्या प्रारंभिक काळात संस्थेला एक नैतिक अधिष्ठान  देण्यात,माझ्या या सर्व सहकार्‍यांनी मोलाचे काम केले  आणि त्यामुळे उत्तरोत्तर सेतु ची प्रगती होतच राहिली.पुढे आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही सेतुच्या लौकिकात भरच टाकलेली आहे. दुर्दैवाने मी मागे सांगितल्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी सेतुच्या एका शाखेत, काही आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे झाली. नियम डावलून, काही सभासदांना कर्ज वाटप झाले,त्यामुळे संस्थेला  मोठा आर्थिक फटका बसला. मला अजुनही असे वाटते की तो एक अपघात होता,कोणीही मुद्दामहून असा प्रकार सेतुच्या  बाबतीत तरी करणार नाही ,मात्र यापुढे ,संबंधित संचालकांनी दक्षता घेणे हे खूप जरुरीचे आहे.अयोग्य प्रकारे वाटप झालेल्या ,बहुतेक रकमेची परतफेड झालेली आहे.थोड्या रकमेची अजून वसुली होणार आहे , ती होईल अशी खात्री आहे.

         सेतु संस्थेच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः 1984 ते 88 च्या या कालखंडात जेव्हा माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती, मला खूप कमी वेळ उपलब्ध होता.कारण त्याच वेळी , भारत सरकारच्या तेल शुद्धीकरण, सरकारी आस्थापनांमध्ये,  मी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करीत होतो. ते खूपच जबाबदारीचे काम होते,सुमारे सातशे कर्मचाऱ्यांची जबाबदारी, माझ्यावर होती. ऑफिस माझगाव मुंबई, निवासस्थान विलेपार्ले, तर सेतु कार्यालय बोरीवली त्यामुळे, सेतुसाठी बोरीवलीस येऊन वेळ देणे  वा  सहकाऱ्यांबरोबर फिरणे खूप जड जात असे.तरीही संध्याकाळी माझे माझगावमधील ऑफिस सुटल्यानंतर मी सरळ बोरीवलीला येऊन, आमच्या इतर संचालकांबरोबर, भ्रमंती करीत असे. सेतुच्या कामाची माहिती समाज बांधवांना करुन देणे, वर्गणी, भाग भांडवल, ठेवी इत्यादी जमा करणे, अशी कामे करीत असू. याशिवाय काही सुट्टीचे दिवस शनिवार-रविवार असेही आम्ही ,मुंबईत वा  आमच्या  समाजाच्या, बोर्डी ते  विरार, अशा गावांत भ्रमंती करीत असू, कारण मुंबईकर मंडळी शनिवार-रविवारी,आपल्या गावी जात असत.  हे खूपच अति होत होते,पण कामाचे महत्त्व माहीत होते व अधिकाराच्या पदाचा स्वीकार केला,तर त्याला न्याय देणे , हा माझा स्वभावच आहे. आजचा सेतुचा व्याप व समाजाप्रती तिचे दायित्व पाहिल्यावर, त्या दिवसांत केलेल्या कष्टांचे ,समाधान मिळते.

         सध्या गेली चार वर्षे सेतुच्या सल्लागार मंडळावर मी कार्यरत आहे. दैनंदिन व्यवहारात जरी काही संबंध नसला तरी या संस्थेच्या भावी वाटचालीसाठी, ध्येयधोरणे व काही निश्चित मुल्ये जतन करण्याच्या बाबतीत,आजहि थोडाफार हातभार,  यथाशक्ती लागतो आहे ही  आनंदाची बाब आहे .बघता बघता ,’सेतु को-ऑपरेटिव्ह क्रेडिट  सोसायटीचे’ , लावलेले इवलेसे  रोपटे आज 36 वर्षानंतर खूपच फोफावले आहे. सुरुवातीच्या त्या कालखंडात सेतु आमचे सर्वांचेच एक तीर्थक्षेत्र बनले होते, व आजही आमच्या  भावना त्याच आहेत.  तीन तपांच्या अथक परीश्रमांचा,हा मूर्त,मनोहारी, अविष्कार पाहतांना, कुठेतरी, सार्थकतेची भावना सुखावते.आपल्या समाजाची, एक मोठी निकड,अल्पांषाने का असेना, भागविण्यांत, आपला  हातभार लागला, याची धन्यता वाटते.

Setu Board room

     सुरुवातीची ही खडतर भ्रमंती चालू असताना अनेक समाजबांधवांच्या ओळखी नव्याने झाल्या .काही होत्या त्या अधिक घट्ट झाल्या. स्वार्थी तसेच निरपेक्ष वृत्तीच्या अनेक लोकांचे दर्शनही झाले. समाजजीवनाची जवळून ओळख झाली. एका गृहस्थांचे घरी आम्ही  वर्गणी व सभासद नोंदणीच्या निमित्ताने गेलो होतो. गृहस्थ सुखवस्तू होते. उपनगरात चांगल्या मोठ्या घरात राहत होते. मात्र त्यांनी,सेतुचे सभासद होण्यासच नकार दिला .ठेव देणे तर बाजूलाच!  आम्हाला स्पष्ट शब्दांत समज मिळाली ..” मी आपणास ओळखतच नाही, तर माझे पैसे तुमच्याकडे कसे ठेवू??”.. खरोखरच त्या भल्या माणसाने,   आम्हाला रिकाम्या हाताने व जड अंतकरणाने परत पाठविले!! याउलट दुसरा एक माणुसकीचा गहिवर अनुभवलेला प्रसंग. एका निवृत्त गिरणी कामगाराच्या घरी आम्ही गेलो होतो.  गृहस्थ  सेवानिवृत्त होऊन, त्यांच्या फंडाचे  पैसे त्यांना मिळाले होते .या सद्गृहस्थांनी ,काही लाखाचे ते सर्व पैसे ,दीर्घ मुदतीची  ठेव म्हणून आमच्याकडून  सुपूर्द केली.  एकच विनंती केली,’ महिन्याला, माझ्या घरखर्चासाठी म्हणून,व्याजाचे पैसे मला द्या ‘.. समाज बांधिलकीच्या गोष्टी आपण सर्वजण करीत असतो,मात्र अशाप्रकारे कोणताच बडेजाव न करता,आपण,खूप मोठी सामाजिक बांधिलकी दाखवत आहोत याचा जराही अविर्भाव न आणता, त्यानी दिले.  त्याला मोल नाही. त्यांचे नाव श्री. बाबुराव पाटील.  अशा लोकांमुळेच कुठेतरी समाजसेवेसाठी कष्ट करण्यात आनंद वाटतो,धन्यता वाटते . समाज कार्यकर्त्यालाही  मोठे उत्तेजन मिळते  .अशांचे  अस्तित्व म्हणूनच आपणा  सर्वांसाठी खूप महत्त्वाचे!!

    सेतुवर असेच  प्रेम करणाऱ्या कै. दत्ताभाऊ राऊत बोर्डी, गोरेगाव यांचे देखील उदाहरण लक्षात ठेवण्या सारखे आहे. दत्ताभाऊंना ज्या दिवशी मुंबईच्या महापौरांकडून, “आदर्श शिक्षक “म्हणून पारितोषिक मिळाले, ते  हजार रुपये, लिफाफाही न उघडता, त्यांनी सेतु कार्यालयात आणून,देणगी म्हणून सुपूर्द  केले. अशा लोकांच्या निस्सीम प्रेमामुळेच सेतु उत्तरोत्तर वाढत गेली.

    सेतुच्या  पायाभरणीत  व आजच्या  वाढत्या वैभवात माझे योगदान किती  ते मला  माहित नाही  ,मात्र ते जरी अगदी नगण्य असले  तरी त्यामुळे मला एक आत्मिक समाधान निश्चित मिळाले .माझा समाज मला जवळून पाहता आला .अनेक मित्रांशी कायमची नाती जडली. या अनुभवाचा उपयोग पुढे, सो.क्ष संघ फंड ट्रस्टचा, कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्यात मला खूप उपयोगी पडला . बोर्डीमधील सहकारी पतपेढीचे, सेतुमध्ये विलीनीकरण घडवून आणण्यात, माझाही थोडा हातभार त्या काळांत लागला, हीदेखील खूप आनंददायी घटना.आम्ही भरपूर भटकंती केली,फिरलो, सभा मिटिंगज्, घेतल्या. मात्र त्या पहिल्या आठ दहा वर्षाच्या कालखंडात, मला हे अगदी  अभिमानपूर्वक  नमूद करावेसे वाटते  की  त्या कालखंडात,  आम्ही सर्व सहकाऱ्यांनी , एकही  पैशाचा विनियोग, चहापाणी प्रवासभत्ता वा इतर कोणत्याही लाभासाठी,संस्थेच्या तिजोरीतून घेतला नाही.  यावरूनच जाणकारांनी काय ते जाणावे….परमेश्वराची पूजा म्हणजे तरी काय असते? आपल्या स्वकर्म कुसुमांची पूजाच,देवाला अधिक  भावते. तीच कर्मपुष्पे, ईश्वरचरणी रुजू होतात,आणि त्यामुळेच भवतालाला चैतन्य प्राप्त होतेअसे  …या ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दातच या लेखाचा समारोप करतो.

                  तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा,

                   पूजा केली होय अपारा, तोशा लागी ||

                                                                           –  दिगंबर राऊत,  माजी अध्यक्ष, सेतू.को-ऑ.क्रे.सो.लि