पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक, एक तेजोमय पर्व!   

9 फेब्रुवारी 1914 – 7 ऑक्टोबर 1998.

केवळ सो. क्ष. समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये, आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेले एक तेजस्वी विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब वर्तक होतं. विरार ग्रामपंचायतच्या सरपंचाची जबाबदारी घेतल्यापासून ते पुढे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेल्या भाऊसाहेबांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत अनेक पदे समर्थपणे भूषविताना राज्य सरकारमध्येही कर्तुत्वाने राजकारणावरही आपला ठसा उमटविला. त्यांचे काही  कार्य एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. राजकारणाबरोबरच शिक्षण सहकार नागरी सुविधा शेती ग्राम सुधारणा क्रीडा धार्मिक इत्यादी विविध क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. एकदा स्वीकारलेल्या जबाबदारीला आपण न्याय दिला पाहिजे हा त्यांचा आदर्श ही घेण्यासारखा आहे.

    एक कुशल संघटक, बेडर नेतृत्व, उत्तम प्रशासक गांधीवादी आणि तरीही कुटुंब वत्सल अशा अनेक विविध गुणसंचया मुळे भाऊसाहेबांनी आपले बहुआयामी नेतृत्व सिद्ध केले. त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे असले तरी राज्याचे मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रा समोर त्यांनी आपल्या कामाचा आदर्श ठेवला होता.

    आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघा व्यतिरिक्त भाऊसाहेबांनी उभ्या केलेल्या अथवा विकसित केलेल्या संस्थांची यादी पाहू गेल्यास ती शेकड्याने होईल. त्यातील काही ठळक म्हणजे नेहरू मेमोरियल सेंटर वरळी,जीवन विकास केंद्र विलेपार्ले, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तारापूर अणुकेंद्र पुनर्वसन, मत्सोद्योग सहकारी प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी शिक्षण संकुल नाशिक, फलोद्यान योजना महाराष्ट्र सरकार, आदिवासी लँड रिफार्म योजना इत्यादी. यावरून भाऊसाहेबांनी योगदान  दिलेल्या विविध कार्यक्षेत्रांची विविधता व महत्त्व समजून येईल.

   हा लेख भाऊसाहेब आणि आमचा सोमवंशीय क्षत्रिय समाज तसेच या समाजातील एक लहान कार्यकर्ता म्हणून या महान व्यक्तिमत्त्वाशी आलेला माझा वैयक्तिक संबंध व मला मिळालेले त्यांचे मार्गदर्शन, एवढ्या पुरतीच मर्यादित असणार आहे.

       भाऊसाहेबांचे पिताश्री माननीय अण्णासाहेब वर्तक व त्यांचे तत्कालीन सहकारी यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी 1921 साली आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती  संघाची स्थापना केली. त्या रोपट्याला खऱ्या अर्थाने विकसित करून त्याचा वटवृक्ष बनविण्याचे काम भाऊसाहेब व त्यांच्या पिढीने केले. भाऊसाहेबांच्या कारकिर्दीत  आमच्या समाजात अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दादर, तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह दादर,अण्णासाहेब वर्तक समाज मंदिर वसई, ही व अशाच अनेक  समाजोपयोगी  संस्था उभ्या झाल्या. भाऊसाहेबांचा विशेष कटाक्ष हा समाज शिक्षण व समाजातील भावी पिढीला उच्च विद्या विभूषित करून, त्यांच्या हातात शिक्षणाचे प्रभावी अस्त्र देऊन, त्यांना  भविष्यकालीन स्पर्धेसाठी सज्ज करणे हाच होता. त्यामुळेच आमच्या सो क्ष समाजातील अनेक तरूण उच्चविद्याविभूषित होऊन आज देश-परदेशात  आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहेत. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचे निर्माण ही आमच्या सो क्ष समाजाच्या समाजिक परिवर्तनाची एक मोठी पायरी आहे.कै. भाऊसाहेब वर्तक यांच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले आहे.

        पूर्वीचे कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व कै तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह. आत्ता या वास्तूचे पुनर्बांधणीचे काम चालू आहे.

      1961 खाली या स्मारक मंदिराचे काम पूर्ण होऊन  लग्नसमारंभ व इतर कार्यासाठी खाली  एक हॉल व पहिल्या मजल्यावर वसतिगृह अशा रीतीने येथे वस्तीगृहाची  सुरुवात झाली. पहिले रेक्टर  म्हणून श्री मधुकर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली( पुढे ते डॉक्टर मधुकर ठाकूर झाले.) मी सन 1963 साली विद्यार्थी म्हणून या वसतीगृहात आलो.त्यावेळी मला यु डी सि टी UDCTम्हणजे आजची आई सि टी..ICT  ,INSTITUTE OF CHEMICAL TECHNOLOGY..,या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेमध्ये बीएस्सी टेक् या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता. मुंबईत राहण्यासाठी कुठेच जागा नव्हती. युडीसीटी वस्तीगृहात राहणे परवडणारे नव्हते.आण्णासाहेब  वर्तक स्मारक मंदिरात जागा उपलब्ध होती. अशा रीतीने माझा सोमवंशी क्षत्रिय संघाशी पहिला परिचय  या वसतिगृहापासून झाला ,जो आजतागायत टिकून आहे.

 श्री  ठाकूर यांनी वस्तीगृहाची रेक्टरशिप सोडून् उच्च शिक्षणासाठी इंग्लंड ला जाण्याचे ठरविले. नवीन रेक्टरची नेमणूक विश्वस्त मंडळीना करावयाची होती. माझी ही इच्छा आपण रेक्टर व्हावे अशी होती.  मात्र त्यावेळच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमध्ये मी ज्युनियर होतो. वसतिगृहात पहिल्या वर्षापासून असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानाने मला वसतिगृहाचा अनुभव कमी होता. माझी नेमणूक होईल असे मला वाटत नव्हते. मात्र विश्वस्त चिंतामणराव वर्तक व कार्यकारी विश्वस्त मामासाहेब ठाकूर या दोन व्यक्तींनी माझे दोन वर्षात वस्तीगृहातील काम, वर्तन व शिक्षण पाहून मला एक दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये बोलाविले.  

  “तुझ्या नावाची शिफारस आम्ही भाऊसाहेबां कडे (जे त्यावेळी मुख्य विश्वस्त होते), करणार आहोत. तुझी तयारी आहे का?”असे विचारले. मला तर आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

  मी आत्मविश्वासाने त्यांना,” जरूर माझी शिफारस करा मी  जबाबदारी घेण्यास तयार आहे”, असे सांगितले.

  याचवेळी त्यांनी मला एक महत्वाची सूचना ही केली. “तुझ्यापेक्षा सिनीयर विद्यार्थी येथे आहेत. त्यांनीही या जागेसाठी आमच्याकडे विचारणा केली आहे  अशा नाराज विद्यार्थ्यांना तुला सांभाळून घ्यावे लागेल”.

  त्यालाही मी तयारी दाखवली.

  ” आपण काळजी करू नका.  त्या विद्यार्थ्यांचीही मी मर्जी संपादन करीन व हे काम आपल्या अपेक्षेनुसार करण्याचा प्रयत्न करीन”, असे आश्वासन दिले .           

   पुढे मुख्य विश्वस्त भाऊसाहेब, चिंतामणराव व कार्यकारी विश्वस्त मामा ठाकूर यांचे बरोबर विश्वस्तांच्या कार्यालयातच एक अनोपचारिक चर्चा झाली. भाऊसाहेबांनाही माझी निवड ठीक वाटली होती. त्यांनी  मला शुभेच्छा दिल्या.  

   माझी व भाऊसाहेबांची प्रत्यक्ष समोरासमोरील ती पहिली मुलाखत. भाऊसाहेबांची निर्णय क्षमता व विचारांतील स्पष्टता मला त्या छोट्या भेटीत जाणवली. कारण एका ज्युनिअर विद्यार्थ्याला रेक्टरशिपची संधी देताना विश्वस्तांनी जोखीम  पत्करली होती. मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी माझ्यासाठी ती उत्तम संधी होती.

    1965 साली वसतिगृहाचा रेक्टर म्हणून माझी नेमणूक झाली. अपेक्षित असल्याप्रमाणे काही सिनिअर विद्यार्थ्यांनी माझ्याशी असहकार सुरू केला. ‘मला हे काम जमत नाही’, हेच विश्वस्तांना दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश होता. आमच्या साप्ताहिक सभांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना अनुपस्थिती,रात्री परवानगीशिवाय उशिरा येणे, न सांगता कधीही घरी निघून जाणे, इतर विद्यार्थ्यांना बेशिस्तीसाठी उत्तेजन देणे, अशा प्रकारचे उद्योग हे मित्र करीत. एकदा माझ्या विरुद्ध एक अनामिक तक्रार पत्र त्यांनी भाऊसाहेब व ईतर सर्व विश्वस्तांना पाठविले. ते पत्र  विश्वस्तांनी मला दाखविले. मी त्यांच्यापुढे माझी बाजू मांडली. 

      “हा निव्वळ खोडसाळपणा आहे मला सहकार्य न करता वस्तीगृहाचे नियम डावलूनल वर माझ्यावर खोटे आरोप ही मंडळी करीत आहेत”, असे मी सांगितले. व त्यांना पुरावे ही दिले. खूप मनस्ताप झाला होता. हे काम सोडून द्यावे व आपला अभ्यास करावा असेही वाटले. मात्र ‘एकदा हाती घेतलेले काम नेटाने पुढे नेले पाहिजे’, ही माझी वृत्ती असल्याने ,विश्वस्तांना ,”मला थोडा अवधी द्या..” अशी विनंती मीकेली. ती मान्य झाली.

  पुढे एके दिवशी  भाऊसाहेब स्वतः विश्वस्त कार्यालयात आले असता त्यांनीही माझ्याशी त्या पत्राबाबत बोलणे करून , “तू त्याकडे जास्त लक्ष देऊ नको, आपले काम पुढे ठेव!” असा धीर दिला. तो माझ्यासाठी खूप मोलाचा होता.

त्यावेळी भाऊसाहेबांचा पाठिंबा मला नसता तर रेक्टर पदावरून माझी गच्छंती होण्यास वेळ लागला नसता ..

 ज्या शाळेने  शिक्षण व संस्कार दोन्ही दिले,ते बोर्डीचे सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल  .

    माझ्या सुदैवाने त्यावेळी आमच्या वस्तीगृहातील एक सीनियर विद्यार्थी श्री रवींद्रनाथ ठाकूर यांना माझ्याविषयी खूप सहानुभूती होती. माझ्या प्रामाणिकपणावर, नेतृत्वगुणावर वर त्यांचा विश्वास होता. खरे तर ते स्वतः देखील रेक्टर पदासाठी लायक होते. पण त्यांना स्वतःला ते पद  नको होते. ते वसतिगृहात घडणारे सर्व प्रकार पहात होते. तक्रारदार विद्यार्थ्यांशी श्री रवींद्र ठाकूर यांचे चांगले संबंध होते. एके दिवशी त्यांनी माझी व विरोधकांची एक सामोपचाराची मीटिंग  घडवून आणली. सुदैवाने श्री ठाकूर यांच्या शब्दाला किंमत होती. हे प्रकरण शेवटी सामोपचाराने मिटले. सर्व विद्यार्थ्यांचे सहकार्य मला मिळू लागले. माझे काम व्यवस्थित सुरू झाले. मित्रवर्य रवींद्रनाथ ठाकूर आज या जगात नाहीत, काही वर्षांपूर्वीच ते निवर्तले. मी त्यांचा सदैव ऋणी आहे .

   या प्रकरणात मला भाऊसाहेबांचेही एक वेगळे रूप पहावयास मिळाले. एरवी अत्यंत शिस्तप्रिय, कणखर कठोर असणारे भाऊसाहेब माझ्या बाबतीत खूपच सौजन्याने वागले. मला धीर दिला. तात्यासाहेब चुरी विद्यार्थि  वसतिगृह रेक्टरची माझी कारकीर्द यशस्वी होण्यास त्यांचा हातभार लागला. पुढे भविष्यात ,सोमवंशी क्षत्रिय संघ फंड ट्रस्ट या संस्थेचा कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली याचे कारण त्या यावेळी भाऊसाहेबांनी मला दिलेले  उत्तेजन कारणीभूत आहेत, हे नमूद करण्यास मला  संकोच वाटत नाही.

  कै.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह  रेक्टर व कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व्यवस्थापक, असे दुहेरी जबाबदारी असलेले  काम मी 1965 पासून सुरू केले. डॉ.मधुकर ठाकूर व मी, आम्ही पहिले दोन रेक्टर आहोत ज्यांनी अशी दोन्ही कामे सांभाळली. 1969 साली श्री पांडुरंगराव पाटील हे स्मारक मंदिराचे व्यवस्थापक म्हणून रूजू झाले. माझी एक जबाबदारी संपली..पदव्युत्तर परीक्षेचा अभ्यास,वसतिगृहाचे काम,स्मारक मंदिर व्यवस्थापन ,अशा सर्व आघाड्या सांभाळीत दिनक्रम चालू होता.  हॉलचे व्यवस्थापन कठीण होते. कारण लग्नसराई सुरू असली की तिथे अनेक जबाबदाऱ्या असत .पैशाचा व्यवहार होता . पैशाचा सर्व व्यवहार व्यवस्थित लिहून ठेवून चिंतामणराव वर्तका सारख्या एका काटेकोर हिशोब पाहणाऱ्या विश्वस्तांना अहवाल द्यावा लागे. भाऊसाहेब महिन्यातून कमीत कमी दोन वेळा तरी स्मारक मंदिरात येत. त्यावेळी सर्व विश्वस्त जमा होत भाऊसाहेबांचे मार्गदर्शन घेत. मलाही विश्वस्तांच्या सभेत चर्चेच्या तपशील लिहून मिनिट्स चा आराखडा तयार करून चिंतामणरावांना देणे हे काम असे. मला आठवते एक-दोन वेळा भाऊसाहेबांना दादरला येणे शक्य नसल्याने त्यांच्या सरकारी बंगल्यात मिटींगा  झाल्या होत्या. मीही तेथे उपस्थित होतो. तो एक वेगळाच अनुभव होता. सौ इंदुताई सर्वांचे हसून स्वागत करीत व योग्य तो सन्मान देत. माझी ही वैयक्तिक चौकशी करीत. इंदुताईंशी झालेल्या ओळखीने त्यांच्या सुसंस्कृत सालस व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले.  एक सुस्वभावी, निगर्वी व आपल्या पतीच्या कामात समर्पित असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्या दिवसात भाऊसाहेबांच्या मागे महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री व इतरही अनेक सामाजिक संस्थांचे अध्वर्यु म्हणून बरीच कामे असत. तरीही वेळात वेळ काढून ते कधी दादर तर कधी त्यांच्या बंगल्यावर बोलावून आपल्या संघाचे व ट्रस्टचे काम जातीने लक्ष देऊन करीत. याचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे, कारण मी  काही घटनांचा साक्षीदार होतो.

      मंत्री, राजकारणी, समाज कार्यकर्ता ,म्हणून भाऊसाहेबांचे सभासमारंभात दर्शन होई. पण  भाऊसाहेब एक व्यक्ती व कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व  म्हणून त्यांचे दर्शन मला अशा वेळी होई. सौ ईंदू ताई सुहास्य वजनाने आमचे स्वागत करीत चहापान करीत व माझीही आस्थेने चौकशी करीत.आज मला खूप समाधान वाटते आहे की,  एका मोठ्या व्यक्तीच्या संपर्कात अल्पकाळ का असेना घालविण्याचे भाग्य मला मिळाले.

     भाऊसाहेबांना आदरांजली वाहतांना या छोट्या लेखात मला त्यांच्या या समाजाभिमुख नेतृत्वाचा आवर्जून उल्लेख करावयाचा आहे.  विशेषतः  आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या भावी पिढीला शैक्षणिक सुविधा पुरविण्याबद्दल त्यांना असलेला जिव्हाळा व आणि आंतरिक तळमळ  त्यांचे ठाई नेहमी दिसून येई. नुस्ती तोंडी आश्वासे न देता त्यासाठी जी प्रत्यक्ष कृती करता येईल ती ही त्यांनी करून दाखविली. 

                   तात्यासाहेब चुरी वस्तीगृहात सुरुवातीला फक्त राहण्याशिवाय दुसरी कसलीच सोय नव्हती. सुमारे 25  विद्यार्थ्यांची सोय होती.  ही सोय देखील अपुरी पडत होती. कित्येक होतकरू हुशार विद्यार्थ्यांना केवळ मुंबईत राहावयास जागा नसल्याने शिक्षणाला वंचित व्हावे लागत होते. अथवा गावाहून मुंबई पर्यंत ये जा करण्यांत खूपच कष्ट करावे लागत होते.भाऊसाहेबांच्या ते लक्षात आले होते. ही त्यांची खंत होती. त्यामुळे 1968 साली तात्यासाहेब चुरी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे योग्य स्मारक म्हणून वसतिगृह चे विस्तारीकरण व्हावे अशी योजना  तयार केली.कै.तात्यासाहेब चुरी स्मारक समिती स्थापन झाली. पद्मश्री डॉक्टर हरिश्चंद्र पाटील समितीचे अध्यक्ष होते .त्या समितीने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे  संघाची आर्थिक बाजू मजबूत झाली. वस्तीगृहाला  दोन मजले वाढवून मिळाले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या हस्ते  विस्तारित वस्तीगृहाचे उद्घाटन झाले.व्यवस्थापक म्हणून मलाही त्या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले.

कै तात्यासाहेब चुरी वि. वसतिगृहाचे विस्तारीकरण झाल्यानंतर उद्घाटन प्रसंगी कै. वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचा सत्कार करताना कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक.

      जागेच्या उपलब्धी नंतर ,माझ्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांसह विचार विनिमय करून आम्ही वसतिगृहासाठी काही वाढीव सुविधां मिळाव्यात याकरिता विश्वस्तां कडे प्रस्ताव दिला.  भोजनालयाची व्यवस्था, विद्यार्थी वाचनालय, वैद्यकीय उपचारासाठी बाहेरून येणाऱ्या समाज बांधवांसाठी निवास व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमासाठी  आर्थिक निधी अशा काही  सूचना आम्ही कार्यकारी विश्वस्तामार्फत मांडल्या.मला खरोखर सांगावयास आनंद वाटतो की भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त  मंडळींनी सर्व सूचना मंजूर करून आमचे वसतिगृह आदर्श व संपूर्ण होण्यासाठी  करता येईल तेवढी मदत केली. आर्थिक सहाय्य केले. विशेषतः  भोजनाची व्यवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच सोयीचे झाले. त्यांना  अभ्यासात जास्त वेळ मिळू लागला.  साधे परंतु सकस जेवण अल्प किमतीत  मिळू लागले.भाऊसाहेबांनी या सुविधा निर्माण करण्याआधी माझ्याशी व आमच्या विद्यार्थी मित्राशी अनेक वेळा जातीने चर्चा करून अंमलबजावणी केली होती.एवढ्या मोठ्या  मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने एवढ्या कार्य बाहुल्यातूनही वेळ काढून विद्यार्थ्यांच्या,इतरांच्या दृष्टीने किरकोळ वाटणाऱ्या, बाबीकडे जातीने लक्ष देऊन या सोयी निर्माण करून दिल्या भाऊसाहेबांना आमच्या विद्यार्थ्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्याचे हे प्रतीक आहे. त्याबद्दल त्यावेळीची व आताची विद्यार्थ्यांची पिढी त्यांचे सदैव आभारी  राहू. त्यावेळी साहेब राज्याचे महसूल मंत्री होते तरीही  प्रचंड व्यापातून ते आमच्यासाठी वेळ काढीत .हे लक्षात घेतले तर त्यांच्या या कामाचे विशेष सामाजिक मूल्य आहे.

         मी तात्यासाहेब चुरी वस्तीगृहाचे  काम1971 च्या मार्च पर्यंत पाहिले. त्यानंतर लग्न झाल्यामुळे मला वसतिगृह सोडावे लागले. 1970 च्या मे महिन्यात संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने मोठा सोहळा करण्यात आला.  बोर्डी शाळेच्या क्रीडांगणावर सर्व कार्यक्रम पार पडले. त्यावेळची ही एक आठवण आहे. मी व भाऊसाहेब यांतील एवढ्या वर्षांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध तात्पुरते का असेना दुरावल्या सारखे झाल्याने ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली आहे म्हणून येथे मुद्दाम देत आहे.

   या सुमारास आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक छोटेसे मंडळ, ज्यात विशेषेकरून वसतिगृहाचे माजी विद्यार्थी तसेच वसतिगृहात न राहणारे पण ज्यांना समाजाविषयी आस्था आहे,अशा लोकांचे हे मित्रमंडळ होते. पुढे सुरू केलेल्या, ‘तात्यासाहेब चुरी वसतिगृह माजी  विद्यार्थी संघाची’, ही सुरुवातच होती म्हणाना! आम्ही यावेळी “छात्र सेतू” नावाचे एक पाक्षिक देखील सुरू केले होते. ज्यामुळे समाजातील तरुणांना आपले विचार, समाजाविषयी आपल्या भावना तत्कालीन समाज धुरीणांकडून अपेक्षा, व्यक्त करण्याचे ते एक माध्यम होते . सुवर्ण महोत्सव आमच्यासाठी एक मोठी संधी होती.आम्ही त्यावेळी चे अध्यक्ष व समाजाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब वर्तक यांना विनंती करून त्या  महोत्सवात एक तास तरी तरुणांच्या संवादासाठी द्यावा,अशी विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली. तरुण मित्रांनी त्यात सहभाग घेण्याचे ठरवले. मी देखील एक  होतो.वसतिगृहाचे काम पाहत असल्यामुळे मला तत्कालीन समाजाची परिस्थिती, विद्यार्थ्यांची मने, त्यांच्या अडीअढचणी व अपेक्षा याची जाणीव होती. 

   त्या युवा संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्री भानुदास सावे हे उमदे तरुणांविषयी आस्था असणारे व विद्वान व्यक्तिमत्व होते. या परिसंवादात आपल्या समाजाचे तत्कालीन धुरीण कै. भाऊसाहेब कै. चिंतामणराव वर्तक,  कै मामासाहेब ठाकूर,कै. दादासाहेब ठाकूर कै. मामासाहेब ठाकूर, कै बाबुरावजी सावे,अशी दिग्गज मंडळी मुद्दाम हून उपस्थित होती. महोत्सव बोर्डीत असल्याने बोर्डीची ही बरीच प्रतिष्ठित मंडळी मुद्दाम आली होती. सर्वच तरुणांनी जोरदार भाषणे केली. बहुतेकांचा सूर “समाजाकडून आजच्या तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमतरता आहे व त्यांना  नेतृत्वात संधी देणे जरुरीचे आहे”, असा होता. त्यानंतर समाजातील काही नेतेमंडळीही आपले विचार मांडले. भानुदास सावे यांचेही शेवटी समारोप करणारे भाषण झाले. कार्यक्रम खूप छान झाला. मात्र माझे भाषण थोडेसे जहाल झाले हे आज मलाही पटते. तरुण वर्गाने भाषणाच्या वेळी, वेळोवेळी दिलेल्या टाळ्या यावरून मीही थोडा उत्तेजित  झालो होतो. 

    माझ्या म्हणण्याचा सारांश  होता की ,”आपल्या समाजात आता अनेक तरुण सुशिक्षित होऊन निरनिराळ्या विद्याशाखांमध्ये प्रावीण्य मिळवीत आहेत. त्यांनाही समाजासाठी योगदान द्यावे अशी प्रामाणिक इच्छा आहे. आमच्या समाज नेतृत्वाने या तरुणांच्या शिक्षणाचा व अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा”,, अशी विनंती मी शेवटी केली.परंतु या बाबतीत त्यांची निराशा होत असून त्यांचे समाधान करणे जरुरीचे आहे.”.  हे सांगताना अनवधानाने काही मंडळी वर थोडीशी अप्रत्यक्ष टीका झाली असावी. परिसंवादाचे अध्यक्ष श्री. भानुदास सावे यांच्या हे लक्षात आले असावे. त्यांनी समारोपाचे भाषणात, “ही तरुण मंडळी आहेत. विचार अपरिपक्व असले तरी प्रामाणिक आहेत. त्यांच्या भावना समजून त्यांच्यावर राग धरू नका.” हे स्पष्टपणे सांगितले. आमची बाजू थोडी सावरून घेतली.  भाऊसाहेबांची नाराजी  होऊन तणाव होऊ शकतो ही कल्पनाही त्यांना आली असावी. मात्र व्हायचे ते झालेच. मान. भाऊसाहेबांना परीसंवादातील तरुणांचे बोलणे, विशेषतः माझे बोलणे, आवडले नसल्याचे इतर मंडळी कडून कळले. कारण भाऊसाहेबांनी कोणतेच भाष्य त्या संवादातून केले नाही.

   भाऊसाहेबांच्या विश्वासाला कुठेतरी धोका मी दिला होता. ‘वसतिगृहाचा रेक्टर असताना असे वक्तव्य भर परिषदेत करणे योग्य नव्हे’ असे त्यांचे मत होते. ते रास्तही होते. परंतु माझ्या हातून ती गोष्ट घडली होती हे खरे. पुढे काही दिवस भाऊसाहेब वसतीगृहावर येत परंतु माझ्याशी विशेष बोलत नसत. हे मला जाणवले. सुदैवाने विश्वस्त कै दादासाहेब ठाकूर यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी सामोपचाराने एका बैठकीत हा प्रश्न मिटविला. माझे साठी हा एक मोठा दिलासा होता. मीही भाऊसाहेबांकडे मनापासून दिलगिरी व्यक्त केली.

  “कोणत्याही प्रकारे आपला वा समाजनेतृत्वाचा उपमर्द करण्याचा हेतू नव्हता. तरुणांना काहीतरी वाव द्यावा, एवढेच सांगायचे होते” असे सांगितले. दादांनीही यात चांगली भूमिका बजावली. भाऊसाहेब त्यावेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील एक महान व्यक्तिमत्त्व होते. समाजाचेही ते सर्वेसर्वा नेते होते.त्यांच्या मोठ्या मनाचे दर्शन मला या प्रसंगातून झाले. माझ्या सुदैवाने यानंतर भाऊसाहेबांनी कोणताही  विकल्प मनात न ठेवता मला जे काही सहकार्य द्यावयाचे होते ते दिले. शेवटपर्यंत त्यांनी मला उत्तेजन दिले. त्यांच्या अखेरच्या दिवसात देखील मी त्यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हाही त्यांनी माझी आस्थेने चौकशी करून आशीर्वाद दिले.

   वज्रादपी कठोराणी, मृदुनी कुसुमादपी!

 हा थोरांच्या गुणांचा प्रत्यय भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वात येतो.

       भाऊसाहेबांनी आपल्या दीर्घ व समृद्ध जीवनांतून अनेक चिरस्मरणीय उपक्रम सुरू केले, पूर्ण केले व अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या जनता जनार्दनासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करून ते अजरामर झाले.  या त्यांच्या अफाट कार्यात त्यांच्या सुविद्य सुशील पत्नी सौ ईंदूताई यांचा ही खूप मोलाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही. इंदुताईंशी माझाही वैयक्तिक परिचय झाला होता हे मी मागे सांगितले आहे. ईंदू ताईंना आपल्या कै. तात्यासाहेब चुरी यांसारखा कर्तुत्ववान पिता लाभला होता. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाच्या स्थापनेत त्यांचाही सिंहाचा वाटा होता.  या  कर्तुत्ववान महिलेचे वर्णन त्यांच्या जाऊ बाई श्रीमती ताराबाई वर्तक, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,यांचे शब्दातच ऐकूया…

         माननीय कै. भाऊसाहेब व कै सौ इंदूताई एका विसाव्याच्या क्षणी..

   ” भाऊसाहेबांच्या पत्नी सौ इंदुताई यांच्या चेहऱ्यावरील सुसंस्कृतपणा, शालिनता व खानदानीपणा पाहिल्यावर वाटते की मा भाऊसाहेब आपल्या घराबाहेरच्या जगामध्ये आत्मनिर्धाराने व कणखर वृत्तीने वागत असले तरी सौ ईंदूताईंना पाहिल्यावर त्यांचे करारीपणाचे शस्त्र सहजगत्या निखळून पडते. आपणास कुटुंब प्रमुखाची जबाबदारीही पार पाडावयाची आहे म्हणून ते भारावून जातात. सौ ईंदू ताईंची प्रकृती तशी थोडीशी नाजूकच असे.आपल्या दम्याच्या आजाराला सोबत घेऊन बरीच वर्षे त्या त्याच्याशी झुंज देत होत्या. परंतु स्वभावामधील संयम त्यांनी कधीही ढळू दिला नाही. धिरोदात्तपणाने वागून दुसऱ्याच्या सुखदुःखाशी ही त्या समरस झाल्या. भाऊसाहेबांच्या करारी स्वभावाला आवर घालून त्याला आपल्या संयमी वागण्याची त्यांनी जोड दिली. आपला संसार सुखी केला. सौ ईंदू ताईंच्या प्रकृती अस्वास्थ्याने  भाऊसाहेब कधीही कंटाळले नाहीत. उलट त्यांना सांभाळून घेऊन जगातील सर्व उपयुक्त औषधांचा त्यांच्यासाठी वापर केला. पुण्यात “अभिवादन”,हा छोटेखानी  बंगला भाऊसाहेबांनी त्यांच्यासाठी बांधला.  आम्ही सर्व जावा कौतुकाने ईंदू ताईंना सांगतो,” तुम्ही फार पुण्यवान आहात म्हणून असा भाग्यवंत जोडीदार मिळाला”. त्यांच्या पुण्याच्या बंगल्याला आम्ही ‘लक्ष्मी नारायणाचे मंदिर’, असाच नेहमी उल्लेख करतो”.

    म्हणतात ना,” गुणी गुणंवेत्ति..”, या न्यायाने एका कर्तृत्ववान महिलेने दुसऱ्या गुणवंत महिलेचे, हिंदू ताईंचे केलेले हे वर्णन तंतोतंत लागू पडते.त्यावर जास्त मल्लिनाथी करण्याची गरज नाही.सौ.ईंदुताई होत्या म्हणूनच भाऊसाहेबांचा कर्तुत्व-रथ सतत पुढे जात राहिला एवढे निश्चित!

कै अण्णासाहेब वर्तक. भाऊसाहेबांचे श्वशूर कै. तात्यासाहेब चुरी व पिताश्री 

मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे  समाज कार्याच्या निमित्ताने माझा माननीय भाऊसाहेबांशी झालेला परिचय व त्यातून जाणवलेले त्यांचे जगावेगळं  व्यक्तिमत्व, मला समजलेले भाऊसाहेब, यावरून मी हे विचार मांडले आहेत .त्यांच्या समाजकार्याचा आंतरिक गाभा  म्हणजे त्यांची शिक्षणाप्रती, विशेषतः तरुण,मागास विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी असलेली आस्था, तळमळ व त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची  धडपड ,हा होता!! भाऊ साहेबांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माझे मित्र विलास बंधू चोरघे यांनी प्रकाशित केलेल्या “स्मृतिगंध” या स्मृतिपुष्पांतून ज्यांनी आपले विचार मांडले आहेत त्यापैकी अनेकांनी भाऊसाहेबांचे हेच गुणवैशिष्ट्य  अधोरेखित केले आहे. त्यापैकी काहीं सन्माननीयांच्या विचारांचा गोषवारा मुद्दाम येथे देत आहे, म्हणजे मला जे सांगावयाचे होते ते अधिक सुस्पष्ट होईल .

भाऊसाहेबांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्या विषयी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ,माजी केंद्रीय मंत्री भाऊसाहेबांचे एकेकाळचे सहकारी माननीय शरद पवार साहेब म्हणतात

   “अनेक शैक्षणिक संस्थांची धुरा त्यांनी सांभाळली. काम करणाऱ्यांना आत्मविश्वासाने पुढे नेणे, संस्थात्मक प्रश्न हळुवारपणे हाताळणे, मूल्याधिष्ठित कार्य शैक्षणिक क्षेत्रात प्रस्थापित करणे ,व व्यवस्थापनात अद्यावतता आणणे ही त्यांची विशेष कामगिरी होय. महाराष्ट्रातील गोखले एज्युकेशन सोसायटी,विद्यावर्धिनी, तसेच त्यांच्या स्वतःच्या सो क्ष समाजातील कार्य या माध्यमांतून त्यांनी केलेले काम शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटावा असे आहे. शिक्षणातून समाजकारण व समाजकारणातून ज्ञानकारण असे अलौकिक कार्य प्रदीर्घकाळ आपल्या अंगीभुत गुणामुळे कुशल कार्यनिष्ठ सहकार्यांमुळे भाऊसाहेबांच्या हातून झालेले आहे.”

    माजी विधानसभा अध्यक्ष व भाऊसाहेबांचे सहकार क्षेत्रातील सहकारी वि स पागे . साहेबांनी म्हटले आहे..

   “भाऊसाहेबांचे नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्रातील अतिशय नामवंत अशा शिक्षण संस्था, समाज संस्था, उद्योग संस्था यांचा व्याप व उद्दिष्टे विविध व वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  नाशिकची ख्यातनाम गोखले शिक्षण संस्था, वडाळा मुंबई येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वसईचे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, पालघरचे सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, वसई येथील ग्राहक सहकारी संस्था, बोर्डी कोसबाड भागातील आदिवासी शिक्षण विकास संस्थांचे जाळे, या सर्व संस्थांच्या कार्याचा ओझरता निर्देश केला तरी भाऊसाहेबांनी समाज जीवनातील स्थित्यंतरासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षण संस्थांची बांधणी करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार कार्य करून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श निर्माण केला आहे .आदिवासी विभागातील गोरगरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे कार्य करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्ती यांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन भाऊसाहेबांनी केले आहे त्यांच्या शैक्षणिक कार्याला जोड नाही”..

      श्री परशुराम म्हात्रे माजी उपाध्यक्ष आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था भाऊ साहेबांचे एक विश्वासू सहकारी त्यांच्या गुणग्राहकतेबद्दल म्हणतात,

      “आपल्या सर्व शाळांतील निकालांकडे भाऊसाहेबांचे बारकाईने लक्ष असे. निकाल असमाधानकारक लागल्यास शिक्षकांना विश्वासात घेऊन प्रसंगी समज देऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून त्यांचा सतत प्रयत्न असे.चांगल्या शिक्षकांचे नेहमीच कौतुक होत असे. गरीब विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेबांनी प्रथम स्वतः देणगी देऊन एक निधी स्थापन केला असून त्याद्वारे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये पाच हजार पर्यंत मदत दिली जाते.” ते नेहमी कृतिशील असंत व आपल्या उदाहरणांनी इतरांना कामास लावीत

    कै. माननीय अण्णासाहेब वर्तक, मातोश्री सौ अन्नपूर्णाबाई वर्तक व सर्व वर्तक कुटुंबीय. कै.अण्णासाहेबांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त घेतलेले दुर्मिळ  छायाचित्र.

     भाऊसाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या “अमृतांजली” या ग्रंथात भाऊसाहेबांचे मनोगत आले आहे.  आपल्या जीवनावर दोन व्यक्तींचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले आहे! ते म्हणतात, ” माझ्या जीवनातील अमृत महोत्सवाच्या या शुभप्रसंगी ज्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वावर सुसंस्कार केले, ज्यांच्या छायेत व सहवासात वाढत असताना माझ्या अंगी सत् प्रवृत्तीचा विकास होत गेला त्यांचे मला स्मरण कृतज्ञतापूर्वक स्मरण होते. त्यातील सर्वप्रथम माझे पूज्य पिताजी स्वर्गीय अण्णासाहेब. अण्णा साहेबांच्या धीरोदात्त वृत्तीचा व त्यांच्या नैतिक आचरणाचा जबरदस्त प्रभाव माझ्या उभ्या जीवनावर पडलेला आहे.”

आपले गुरुवर्य, बोर्डी शाळा व शारदाश्रमातील आचार्य चित्रे व आचार्य भिसे यांच्या बद्दल भाऊसाहेबांनी सदैव कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या सत्कार करताना.

         “स्वर्गीय आचार्य भिसे गुरुजी यांचीही यावेळी मला तीव्रतेने आठवण होते. या ध्येयवादी त्यागी शिक्षक व समाजसेवकांनी बोर्डीचे विद्यालय शारदा श्रम व बोर्डी परीसर आपले कार्यक्षेत्र बनवून सेवा वृत्तीने अखंड कार्य केले. त्यांच्या कार्याने या विद्यालयाचे रूपांतर संस्कार केंद्रांत झाले. आचार्य भिसे यांची प्रखर ध्येयनिष्ठा सेवाभावी वृत्ती, प्रसिद्धी परांङगमुखता, आदिवासी सारख्या दुर्बल व उपेक्षित समाजाची सेवा करण्याची तत्परता,यांचा माझ्या संस्कारक्षम मनावर खोल परिणाम झालाआहे. राष्ट्र प्रेमाची व उदात्त विचारांची प्रज्वलित झालेली ज्योत माझ्या अंतकरणात सदैव तेवत राहिली. त्यातूनच आगाशी-विरार-अर्नाळा एज्युकेशन सोसायटी उगम पावलीआणि शिक्षण संस्था उभ्या करण्याच्या कार्यात मी पदार्पण केले.”

   “राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यकर्त्यांना समाज परिवर्तनाच्या व नवसमाज निर्मितीच्या कार्याला आपण शैक्षणिक कार्यातूनच गती दिली पाहिजे असे मला सातत्याने वाटत असे.”

   मला वाटते वरील थोडक्या शब्दात  माननीय भाऊसाहेबांनी आपल्या जीवनातील  सर्व कामाचे श्रेय दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना दिले व समाज परिवर्तन हे शेवटी शैक्षणिक कार्यातूनच होऊ शकते ही त्यांची श्रद्धा असल्याचे व त्यानुसारच शिक्षण संस्थांचे जाळे उभे करू शकलो असे नम्रतेने सांगितले आहे.  तसै करताना कोणाचीही जात-पात, गरिबी- श्रीमंती ,राजकीय व विचारसरणी याचा  विचार न करता केवळ सर्व-समाज परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले.म्हणून त्यांच्या  समत्व बुद्धीला मानवंदना देताना एवढेच सांगावेसे वाटते की 

    जो सर्वत्र सदासरिसा,परिपूर्ण चंद्रुका जैसा !

   अधमोत्तम प्रकाशा, माजी  न म्हणे!!

जो सर्वत्र समृद्धीने वागतो तोच असे करू शकतो.

      CHARITY BEGINS AT HOME.. (सत्कृत्य आपल्या  घरापासून सुरुवात करा) या न्यायाने  भाऊसाहेबांनी  ज्ञानगंगेचा उगम आपल्या सो क्ष  समाजातून केला, आणि पुढे महाराष्ट्रातील सर्व इतर समाजबांधवांना ही त्याचा लाभ कसा मिळेल हे पाहीले. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर त्यातील तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह आमच्या समाजाची गौरव स्थाने व आमचे मानबिंदू आहेत. आज आमच्या समाजाची झालेली शैक्षणिक आर्थिक व सांस्कृतिक वाटचाल या दोन वास्तूमुळे शक्य झाली आहे. हे मान्य करावे लागेल.म्हणूनच भाऊसाहेबांसारख्या ज्या दृष्ट्या नेत्यांनी आम्हाला या सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांचे आम्ही सदैव शतशः ॠणी राहिले पाहिजे. भाऊसाहेबांच्या स्मृतीला पुनश्च विनम्र अभिवादन!