कवी हृदयी, स्वानंदी, कै. दुगल सर

              कै.नरहर दिनकर दुगल                   
10 डिसेंबर, 1914 – 23 एप्रील, 1993

निन्दन्तु नीतिनिपुणा यदी वा स्तुवन्तु |

लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ||

अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा |

न्याय्यात्पथः प्रविचलन्ति पदं न धीरः ||

    या सुवचनाप्रमाणे स्तुती-निंदा, यश-अपयश, लाभ-हानी, जगणे-मरणे, या सर्वांपलीकडे जाऊन आपल्या  मार्गाने ते चालत राहिले. आर्थिक समस्यांमुळे आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घालावा लागला तरी कौटुंबिक जबाबदारीला नेहमी प्राधान्य देत एक उत्कृष्ट शिक्षक, एक सच्चा समाजसेवक व आदर्श कुटुंबप्रमुख असे जीवन ते जगले. ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्याप्रमाणे:

   “अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक”

या न्यायाने आपला स्वतःचा चौकोनी संसार सुखाचा केलाच परंतु आपले सर्व विद्यार्थी, सहकारी व भोवतालच्या समाज जीवनातही त्यांनी सतत आनंद निर्माण केला व स्वतःही स्वानंदी जीवन जगले. सतत तीन तपे शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक या नात्यांनी त्यांनी ज्ञानदान केले. आपल्या  विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस होऊन शालेय ज्ञान देतानाच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल व ते देशप्रेमी नागरिक कसे होतील यासाठी  विविध मार्गांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन दिल्याप्रमाणे जातीभेद नाहीसे करण्यासाठी रोटीबंदी, बेटीबंदी तोडणे या गोष्टी स्वतःपासून सुरू केल्या. आपल्या पुढील  पिढीतही चालू ठेवल्या. ‘करेंगे या मरेंगे’  या १९४२ च्या लढ्यात सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नेताजी सुभाषचंद्र यांच्या आझाद हिंद सेनेने चालविलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्यसमराचे यथार्थ आकलन करण्यासाठी युवकांना मदत  केली. “थोर देशभक्तां बद्दल आदर व प्रेम बाळगून त्यांच्याकडून घेता येईल तेवढे घ्या, स्वतःचे जीवन उज्वल करा”, असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्याचा सतत प्रयत्न केला. जीवनाच्या अंतिम टप्प्यातही आपल्याजवळ जे देण्यासारखे होते ते अक्षर वांग्ड़मय समाजातील गोरगरीब मुलांसाठी  वाटत राहिले. ते जितके कणखर होते तितकेच कोणाचे भले झालेले पाहण्यासाठी उत्सुकही होते. त्यांनी आत्मसन्मान जपण्यासाठी कधीही  अन्याय सहन केला नाही. होय, हेच ते बोर्डी  शाळेतील आमचे वंदनीय गुरूवर्य  कै. नरहर दि. दुगल सर, यांना आदरांजली देण्यासाठी हे आजचे लिखाण!!

    बोर्डी हायस्कूलमधील आमच्या  शैक्षणिक  कालखंडातील एक विद्यार्थीप्रिय तसेच प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वातून प्रथम दर्शनीच, त्यांच्या विद्वतेची छाप  विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अफाट व्यासंगामुळे  शिकवतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. वर्गात शिरतानाच त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास व स्मितहास्य जणू दर्शवित असे ,

” मुलांनो आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला अजून कोणी शिकवलेले नाही व शिकवणारही नाही!”

 ते वर्गात कधीही  बसून शिकवत नसत. स्तब्ध उभे ही नसत. बोलताना सतत वर्गभर त्यांच्या फेऱ्या चालू असत. विषय व पाठाच्या अनुषंगाने हावभाव व चेहऱ्यावरील भावही बदलत असत. त्यामुळे वर्गात सतत एक प्रकारचा जीवंतपणा व उत्साह भरून राही. त्यांच्या ज्ञानाचा व शिकविण्याचा आवाका एवढा मोठा होता की  आम्हा विद्यार्थ्यांना ‘ते एखाद्या प्रख्यात महाविद्यालयात प्रोफेसरच असावयास हवेत, आमचे भाग्य ते आमच्या हायस्कूलात आले!’ अशी भावना होई.

  आज  त्यांची जीवनकथा ऐकल्यानंतर ते तसे का झाले नाही याचा उलगडा जसा मला झाला तसा आपणासही होईल! जन्मजात बुद्धिमत्तेला थोडी नशिबाची साथ मिळती तर दुगलसर महाविद्यालय कशाला, ऑक्सफर्ड, केम्ब्रीज  विद्यापीठातच प्राध्यापक  शोभून दिसले असते! पण ते होणारे नव्हते! का? कन्या सौ.नीलोत्पला पुरव यांच्याकडून  कळलेली दादांची ही जीवनकहाणी आपणही वाचा म्हणजे कळेल!  ती एक चित्तरकथाच आहे!!

दुगल कुटुंबीयांचे छायाचित्र: बसलेले( उजवीकडून) दादा,सौ.ललिता दुगल, सर्वात छोटा भाऊ, वडील, बहिण व तिचे यजमान.
मागे उभे असलेले,दादांचे पाच बंधु व एक बहीण.

      दादांचे ( कुटुंबीय मंडळी सरांना  दादा म्हणत असत) कुटुंब मूळचे कोकणातले. मात्र त्यांचे पूर्वज नोकरी धंदा व उद्योगासाठी खानदेशातील धुळ्यात स्थायिक झाले होते. दादांचा जन्म 10डिसेंबर 1914 रोजी धुळ्यातच झाला.  खरे तर दादांचे वडील दिनकरराव हे पेशाने इंजिनियर.(व्ही जे टी आय् महाविद्यालय) व चांगल्या सरकारी नोकरीत होते. मात्र त्या काळातील स्वातंत्र्यप्रेमाने भारलेल्या अनेक तरुणांप्रमाणे त्यांनाही आपल्या भारत मातेला स्वतंत्र झालेले पहावयाचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे दैवत  होते. त्यांच्या वरिष्ठांना हे समजले होते. सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्यामागे वरिष्ठांचा व पोलिसांचाही नेहमी ससेमिरा लागलेला असे. वरचेवर बदल्या होत असत . शिवाय  संपूर्ण कुटुंबाला त्रास होई तो वेगळाच ! आपल्यामुळे  आपल्या कुटुंबीयास होणारा जाच वाचावा  म्हणून श्री. दिनकररावांनी सरकारला,

“माझा या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, कौटुंबिक संपत्तीवरील माझे सर्व हक्कही मी सोडून दिलेले आहेत” असे लिहून देऊनही काही फायदा झाला नाही. सरकारचा ससेमिरा चुकला नाही. शेवटी त्यांनी चांगली सरकारी नोकरी सोडून दिली व खाजगी कंपन्यांत नोकऱ्या केल्या. मात्र त्यामुळे सर्व कुटुंबाला सतत  मानसिक त्रास व  आर्थिक हलाखी सोसावी लागली. 

    हे एक विशाल कुटुंब होते. दादांना सहा भाऊ व दोन बहिणी. मोठा मुलगा म्हणून  त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आली. अकाली प्रौढत्व आले. जन्मजात अत्यंत हुशार असल्याने दादांनी तशा परिस्थितीतसुद्धा आपल्या कुटुंबाला सहाय्यभूत होत  आपले प्राथमिक व मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण धुळ्यात चांगल्या रितीने पूर्ण केले. उत्तमरित्या ते मॅट्रिक पास झाले.  काही  शिष्यवृत्त्याही मिळाल्या. डॉक्टर व्हावे ही त्यांची बालपणापासूनची महत्त्वकांक्षा होती.

   त्याकाळी धुळ्यात महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध  नसल्याने ते पुण्यातील एस्. पी. महाविद्यालयात  सायन्स शाखेत रुजू झाले. अभ्यास चांगला होता. तरी शिष्यवृत्तीची रक्कम कमी पडत असल्याने  शिकवण्या कराव्या लागल्या. वर्गातील हजेरीवर परिणाम झाला. परिणामी पहिल्या वर्षाच्या अखेरीस त्यांची कॉलेजची पूर्ण टर्म (हजेरी) न भरल्याने, कॉलेजने वार्षिक परीक्षेस सायन्स विषय घेऊन  बसण्यास मज्जाव केला. वर्ष फुकट जाऊन शिष्यवृत्ती बंद होण्याची पाळी आली होती. शेवटी त्यांच्या काही प्राध्यापकांनी मध्यस्थी करून ‘सायन्स’ ऐवजी ‘आर्टस्’ विषयांच्या परीक्षेस बसण्यास परवानगी दिली. वर्ष  फुकट गेले नाही. पण जीवनाला एक नवी कलाटणी मिळाली ! डॉक्टरकीचे स्वप्न भंग पावले ते कायमचेच!

   डॉक्टरकीचे शिक्षण नको, निदान आर्ट्सचे (कला शाखेचे) शिक्षण तरी मनाप्रमाणे घेता यावे, तर तिथेही परिस्थिती  आडवी आली. बी ए चांगल्या प्रकारे ऑनर्स मिळवून उत्तीर्ण झाले. कुटुंबातील जबाबदाऱ्याही वाढल्या होत्या. बहिणींचे  शिक्षण व लग्ने, लहान भावांचे शिक्षण यासाठी पैसे मिळविणे आवश्यक झाले होते. ही सर्व बहिण भावंडे अभ्यासात हुशार होती .आपणासं डॉक्टर होणे नाही जमले तरी आपल्या हुशार, धाकट्या भावाला तरी मेडिकलचे शिक्षण मिळावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. त्यासाठी थोडी अधिक आर्थिक कमाई करणे जरुरीचे झाले. एम ए ला मिळालेला प्रवेश रद्द करून दादांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. बी. ए आॅनर्स असलेल्या तरुणाला त्या काळात अनेक चांगल्या नोकऱ्या मिळू शकत होत्या. मात्र दादांना सरकारी नोकरी करावयाची नव्हती. नोकरी करावयाची तर ती वृत्तपत्र क्षेत्रात अथवा शिक्षकी क्षेत्रात असे दोन पर्याय त्यांनी ठेवले होते. एका छोट्या वर्तमानपत्र कार्यालयात नोकरी मिळाली. काम आवडीचे होते. लेखनाचा छंद जपता येत होता. मामा वरेरकरां सारख्या एका वरिष्ठ साहित्यिकाशी संपर्क होता. मात्र पगाराचे पैसे खूप कमी मिळत होते. कौटुंबिक आर्थिक गरजा वाढल्या होत्या व भावाच्या  शिक्षणासाठीही पैसे पाठविणे गरजेचे होते. अपुरा पगार व तोही अनियमित त्यामुळे ही नोकरी सोडावी लागली.

   आता शिक्षकाची नोकरी करावी असे त्यांच्या मनाने घेतले .सुदैवाने त्याच वेळी गोव्यातील एका हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली. गोव्याचे निसर्गसौंदर्य , शांत समाजजीवन , तेथील पोर्तुगीज राजवट या सगळ्या वेगळेपणामुळे  त्यांच्या सौंदर्यवादी वृत्तीला गोव्यात जावेसे  वाटले असावे.

     दादांना शिक्षकी पेशाची आवड होती कारण त्यांच्या आदर्शवादी वृत्तीला  ‘आपला विद्यार्थी हा केवळ पुस्तके शिकून शिक्षित झालेला नको होता. जीवनाचे सर्वांगीण ज्ञान  मिळवून एक अष्टपैलू विद्यार्थी व देशाचा समर्थ भावी नागरिक असा हवा होता.  ‘खेळ ,व्यायाम, राष्ट्रीय वृत्ती व सुसंस्कृत व्यक्तिमत्व, असा माझा विद्यार्थी परिपूर्ण झाला पाहिजे’ ही त्यांची धडपड असे!

    दादांनी या आपल्या पहिल्या शिक्षकी व्यवसायात व पुढेही सदैव, याच एका ध्येयाने प्रेरित होऊन काम केले. ते विद्यार्थ्यात खूप प्रिय झाले.  या नोकरीत पगारही चांगला होता. तो नियमित  मिळत होता. सर्व स्थिरस्थावर होत आहे तेवढ्यात… धुळ्याला आई आजारी असल्याची बातमी त्यांना कळली!…. मातृप्रेमी, कुटुंब वत्सल दादा गोव्यात उत्तम प्रकारे सुरू असलेला आपला व्यवसाय, शाळा सोडून  धुळ्यात हजर झाले.. 

     नियती दादांची परिक्षा पहात होती..!! 

  आईच्या स्वास्थ्यासाठी दादांनी तिच्या औषधोपचार व सेवेत जराही कुचराई केली नाही. जे करता येईल ते सर्व केले . मात्र दुर्दैवाने आई वाचू शकली नाही. ती आपल्या लाडक्या अजाण  मुलांना सोडून देवा घरी गेली. सर्व कुटुंबावरच दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळली ..अगदी छोटा भाऊ तर लहान बाळ होता.

    म्हणतात ना “माय मरो मावशी जगो..” या न्यायाने गिरगावातील मावशीने या चिमुकल्याचा सांभाळ करण्याचे कबूल केले. त्यामुळे दादा धुळे सोडून मुंबईत दाखल झाले. लहान भावाचे मावशीकडे संगोपन होऊ लागले .गिरगावातील आर्यन हायस्कूलात त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. ‘पुनश्च हरी ओम.,’ सुरू झाले.

आर्यन हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी श्री दुगल सरांना दिलेले मानपत्र

      येथील वास्तव्यात त्यांनी विद्यार्थी व संस्थेचेही प्रेम मिळविले. खूप चांगले काम केले. विद्यार्थी-प्रिय शिक्षक ठरले. आता शिक्षकीच करावयाची असल्याने बी टी करणे भाग आहे हे ओळखून आर्यन हायस्कूलचा  राजीनामा देऊन  पुण्यात बी टी चा  अभ्यासक्रम पूर्ण करावा असे त्यांच्या मनाने घेतले. आर्यन हायस्कूलच्या मुलांना खूप दुःख झाले. त्यांनी आपल्या सरांना मोठ्या सन्मानाने निरोप दिला व एक मानपत्रही दिले .पुण्यात त्यांनी  केवळ बी टी ची पदवीच मिळविली नाही तर येथेच आपली भावी जीवन-साथीही मिळविली! त्यांची भावी वधू ललिता (सामंत) त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए करीत होती.. एके दिवशी योगायोगाने दोघांची गाठ पडली. मने जुळली. त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचे ठरविले. कु.ललिता सामंत सौ. ललिता नरहर दुगल झाल्या !

सांगलीमध्ये दुगल पती-पत्नींनी सुरू केलेल्या इंग्रजी वर्गातील सहकारी व विद्यार्थी, एक दुर्मिळ छायाचित्र 1946-47. मधोमध बसलेले श्री. दुगल सर.

       लग्नानंतर दोघेही सांगलीस गेले. तेथेही दादांनी शिक्षकाची नोकरी केली. मात्र आपल्या इंग्रजी ज्ञानाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांशिवाय इतरांनाही मिळावा या उद्देशाने त्यांनी तेथे एक इंग्रजी कोचिंग क्लास उघडला. त्याची ख्याती सांगली व परिसरात एवढी झाली की  बाहेरूनही इतर शिक्षणसंस्थामधील कित्येक विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी येऊ लागले .सर्व ठीक चालू होते. 

पण  नियतीला दादांचे हे सुख फार वेळ पहावले नाही! सांगलीत प्लेगचा कहर सुरू झाला आणि दादांना स्वतःलाच प्लेग झाला! त्यांच्यासाठी ते जीवावरचे दुखणे ठरायचे, मात्र ‘पोटावर’ निभावले! दादांची पचनसंस्था बिघडली ती कायमचीच! नोकरी व आपला उत्तम चाललेला क्लास सोडून दोघेही एका जवळच्या नातेवाईकांच्या सल्ल्यावरून ठाणे जिल्ह्यातील वसई सारख्या कोकणातील शांत  सुंदर गावी शिक्षक म्हणून रूजू झाले! ही बदली  दादांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली! 

(वर)-आचार्य भिसे यांचे सल्ला घेताना. (खाली)- आचार्यां बरोबर बोर्डी सोडण्यापूर्वी.

     एका समारंभाच्या  प्रसंगी दादा आणि आचार्य भिसे यांची वसईत गाठ पडली. रत्नपारख्याला एक जातीवंत हिरा गवसला! आचार्यांनी दुगल सरांना मोठ्याआग्रहाने बोर्डी हायस्कूलात येण्याचे आमंत्रण दिले. दादांना ते नाकारणे शक्यच नव्हते. दादा बोर्डीत आचार्यांचे सहकारी म्हणून रुजू झाले. ते वर्ष होते जून 1950 !

              भिसे-चित्रेंच्या प्रेमळ आग्रहामुळे ते बोर्डी हायस्कूलात शिक्षक म्हणून रुजू झाले! आणि म्हणूनच सदभाग्यामुळे आम्हाला शिक्षक म्हणून बोर्डीच्या हायस्कूलमध्ये चार वर्षे लाभले. मी जरी फार हुषार विद्यार्थी नसलो तरी माझ्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटण्याचे कारण म्हणजे माझा शालेय व शालाबाह्य सांस्कृतिक चळवळीतील (वक्तृत्व, वाचन, निबंध लेखन इ.) सहभाग. त्यांची जेष्ठकन्या जयप्रभासुध्दा, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. विशेषतः वत्कृत्व स्पर्धेत जिल्हा पातळीवर तिने बक्षीसे मिळविली होती. त्यामुळे वर्गाबाहेरही कधी भेटले तर सर माझ्या या आवडीबद्दल आस्थेने चौकशी करीत व मला प्रोत्साहन देत.

              बोर्डीचे सुनाबाई पे हकीमजी  हायस्कूल.

       “शिक्षण, विद्यार्थ्यांच्या जीवन घडणीची  एक प्रक्रिया’ असली पाहिजे ,माझा विद्यार्थी ‘ संपूर्ण जीवन शिक्षण’ घेऊनच बाहेर पडला पाहिजे” अशी त्यांची प्रामाणिक भावना होती. शिक्षकाने विषय शिकवितांना शिकविण्याचा आनंदही घेतला पाहिजे’ ही त्यांची मानसिकता होती. आम्हा विद्यार्थ्यांना ते सहज जाणवे. विशेषतः कविता, काव्य शिकवितांना तर ते देहभान विसरून जात. सर्व वर्ग उत्साह व आनंदाच्या वेगळ्या पातळीवर तल्लीन होऊन डोलत राही .

  आंग्ल कवी वर्ड्स्वर्थची प्रसिद्ध कविता,’ द सॉलिटरी रीपर'(The Solitary Reaper) ही  इयत्ता नववीत आमच्या वर्गाला त्यांनी शिकविली. माझ्यासाठी ती एक दंतकथा झाली आहे. तो किस्सा मी शाळेचा  विषय निघाला की आवर्जून सांगत असतो. माझ्या  इतर लिखाणातूनही ओघाने आला आहे. मात्र आज खास  त्यांच्यावरील लेखात मी तो प्रसंग मुद्दाम येथे सांगणार आहे. कै. पू. आचार्य चित्रे सरावरील लेखात लिहिलेला हा प्रसंग पुन्हा उद्धृत करीत आहे!

      “एकदा दुगल सर, रजेवर असताना आपण(चित्रे सर) आम्हाला इंग्रजी शिकविण्यास आला होतात. त्यावेळी इतर इंग्रजी अभ्यासाबरोबर, कवी वर्डस्वर्थची  ‘THE SOLITARY REAPER ‘ ही प्रसिद्ध कविता आपण शिकवलीत. आपल्या शिकवण्याबद्दल काय बोलावे? नेहमीप्रमाणेच पिन ड्रॉप सायलेन्स. विषयाचा आशय समजून देण्याची आपली कला आणि प्रत्येकाला समजले आहे ना, ही खात्री केल्यावरच पुढे जाणे ही आपली खासियत. आम्ही आपल्या मुखातून या कवितेचा सुंदर आस्वाद घेतला. तो एक वेगळाच अनुभव होता.”

    “दुगल गुरुजी कामावर  रुजू झाले. त्यांनी रजेच्या कालांत झालेल्या  अभ्यासक्रमाची चौकशी केली. त्यांना वरील कविता  शिकवून झाल्याचे कळले. दुगल गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसली. मात्र ते काही बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी ते वर्गात आले. अगदी खुशीत येऊन म्हणाले ,

  “आज मी तुम्हाला चित्रे गुरुजींनी शिकवलेली ‘द साॅलीटरी रीपर’(The Solitary Reaper) ही कविता पुन्हा शिकविणार आहे. यासाठी, मी चित्रे सरांची परवानगी घेऊन आलेलो आहे.” आम्हाला प्रथम हा काय प्रकार आहे, हेच कळले नाही. एकदा शिकवून झालेला अभ्यास पुन्हा कोणीतरी शिक्षक शिकवितो, हे तोपर्यंत आम्हाला नवलच होते! दुगल सर म्हणाले, 

   ”ही माझी आवडती कविता आहे. या कवितेवर मी खूप  चिंतन केलेले आहे. चित्रे गुरुजींनी मला परवानगी दिली, म्हणूनच माझी ही कविता तुम्हाला शिकवण्याची हौस मी पुरी करतो आहे, पुन्हा शिकवीतो आहे!” 

  त्यादिवशी दुगल सरांनी तो स्कॉटलांड देश, त्यातील खडकाळ हायलँड नावाचा प्रदेश, पायथ्याशी असलेले, भरलेले बार्ली  पिकाचे  शेत, डाव्या हातातील  काड्यांचा चूड आणि उजव्या  हातात कोयता घेऊन, कमरेत थोडी वाकलेली, गाणे गुणगुणणारी, अवखळ एकटी, वनबाला.. क्षणभर काही विचार मनात आल्याने तशीच थांबली आहे. नेमका तो क्षण पकडून कवीने हे सुंदर  काव्य केले आहे.. एका प्रतिभावान कवीच्या भावना तेवढाच संवेदनाशील शिक्षक आम्हाला हळुवारपणे उलगडून दाखवीत होता.. वाह, नुसती बहार आली.. !नवरसांच्या त्या सरींनी आम्हाला चिंब भिजविले…दुगल गुरुजी जणू स्वतःबरोबर संपूर्ण वर्गाला स्कॉटलंडच्या त्या हायलँड भागात घेऊन गेले होते..आणि आम्हाला समोर शेत कापणारी, अल्लड ,खेडवळ,तरुणी डोळ्यासमोर प्रत्यक्ष दाखवीत होते! एक चमत्कार आम्ही अनुभवत होतो ..त्याचे गारुड आजही मनावर आहे.. आठवण झाली की ते दृश्य डोळ्यासमोरून हलत नाही…!!

    ही आठवण येथे सांगण्याचे प्रयोजन एवढेच की आपण शिकवलेला  एक धडा, दुय्यम शिक्षक पुन्हा शिकवू इच्छितो, तरी त्याला परवानगी देणारे आचार्य मोठे, की शिकवून झालेले असून सुद्धा, आपल्या मनाच्या समाधानासाठी , हेडमास्तरांची माफी मागून, पुन्हा तो धडा शिकवणारे दुय्यम शिक्षक मोठे? मला वाटते, हे दोघेही महान आचार्य होते!  तस्मै श्री गुरवे नमः”

आचार्य चित्रे गुरुजी समवेत आपले मनोगत व्यक्त करताना श्री. न. दि. दुगल सर.

      या संदर्भातील  एक सुंदर आठवणही मुद्दाम सांगतो. त्या दिवशीच्या सरांच्या शिकविण्यानंतर, हा स्कॉटलंड देश आणि त्यांतीली ‘हायलँड’भागातील शेते, आयुष्यात कधी तरी बघावी अशी  ऊर्मी  मनाच्या कोपऱ्यात राहून गेली होती . ते माझे स्वप्न होते .पूर्तीचा योग येत नव्हता. एकदा व्यवसायानिमित्त फ्रान्स ते  इंग्लंड असा बोटीने प्रवास केला होता. त्यावेळी इंग्लंडच्या डोव्हर बंदरापासून ते लंडन शहरापर्यंत प्रवास करताना मध्ये कुठे स्कॉटलंडचा भाग दिसतो का म्हणून भाबडेपणाने पाहात होतो. मात्र ते शक्यच नव्हते. पण काय सांगू? काही वर्षांपूर्वी तो योग अचानक आला.. आमच्या कौटुंबिक पर्यटनात मुलांनी इंग्लंड-फ्रान्स या देशांची सफर करण्याचे ठरविले होते. मी मुलांना, “जमल्यास आपण दोन दिवस वाढवून स्कॉटलंडची सफर ही करता आल्यास करूया का?” अशी विनंती केली. आणि ती मान्य झाली. कशासाठी हे तेव्हा कोणी विचारले नाही. लंडनहून पॅरिसला जाण्याआधी आम्ही लंडन-स्कॉटलंड हा प्रवास भाड्याने घेतलेल्या  मिनी बस बसने केला. स्कॉटलंडमधून  जाताना ” हायलँड प्राॅव्हीअन्स्” अशी पाटी दिसली आणि थोड्या विश्रांतीसाठी थांबून तेथे चहा घेऊया ही माझी विनंती ही सर्वांनी मान्य केली. सर्वजण आरामशीर चहापान करताना मी हळूच उठून रस्ता ओलांडून समोरील शेतात, एका कोपऱ्यात  उभा राहून शांतपणे समोरील दृश्य पहात राहिलो.. उंच सखल टेकड्यामध्ये सपाट जमीन आणि जमिनीवर तसेच डोंगर पठारावर  पिवळीशार बार्लीची शेती दिसत होती. मी अगदी स्तब्धपणे ते दृश्य पाहत होतो आणि पाहता पाहता त्या शेतात मला हातात विळा घेऊन कापणी करणारी एक अल्लड खेडवळ बालिका दिसू लागली… हो, तीच ती ‘सॉलिटरी रीपर’.. दुगल गुरुजींनी त्या दिवशी कविता  शिकवितांना आम्हाला दाखविलेली… १९५७ सालच्या सरांच्या त्या ९वी च्या वर्गात मी कधी पोहोचलो हे मला कळलेच नाही.. मला कसलेच भान नव्हते.. मंडळींच्या हाका ऐकून तंद्री भंगली…बसमध्ये बसण्यासाठी पावले मागे वळली. “बाबा तुम्ही मन लावून एवढे काय पाहत होतात?” हा प्रश्न आला आणि मी ही सर्व कथा त्यांना ऐकविली …सर्वांनीच चहापानानंतर त्यादिवशी काव्यरसपान केले!  एक हाडाचा  शिक्षक, मुलांच्या मनावर किती  गारुड करू शकतो याचे हे ज्वलंत उदाहरण!!

   चार वर्षे दुगल सरांकडून इंग्रजी, संस्कृत, मराठी  विषय शिकताना असे अनेक प्रसंग आले आहेत!

दुगल कुटुंबीय सुरुवातीपासून बोर्डीचा निरोप येईपर्यंत, बोर्डीच्या प्रसिद्ध ‘बर्वे-चाळीत’ राहिले. आजही ही चाळ तशीच आहे. बर्वे-चाळीचा व दुगल कुटुंबीयांच्या अगदी डावीकडील खोलीचा फोटो मी मुद्दाम या लेखात दिला आहे. घोलवडहून बोर्डीला जाताना माझी नजर या वास्तूकडे जाते आणि त्या खोली समोर आल्यावर माझी मान आपोआप आदराने लवते! 

बोर्डीची प्रसिद्ध बर्वे-चाळ  व आतील चौकोनात दुगल कुटुंबीयांची, प्रसिद्ध खोली! 

   सन 1950 पासून 1962- 63 पर्यंतची वर्षे आनंदात गेली. सरांनी शाळेला खूप दिले. संस्थेने सरांना सन्मान दिला. विद्यार्थी ही भरभरून ज्ञानकुंभ घेऊन गेले. त्या काळांत आमच्या बोर्डीची शाळा ठाणे जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात एक आदर्श शाळा म्हणून गणली जात होती. बोर्डीच्या शारदाश्रमच्या कीर्तीचा डंका अखंड भारतात वाजत होता. आमच्या शाळेचे काही चांगले उपक्रम, सुंदर संकल्पना इतर शाळाही राबवू लागल्या होत्या .आमच्या शाळेत पूर्वीपासून एक सुंदर व्यवस्था मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सेवा समिती’ मार्फत सुरु होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वाटणी निरनिराळ्या सहा गटांत होत असे. मुलांचे चार मुलींचे दोन असे सहा गट असत. त्यांचे संघनायक  असत व त्यांना विशिष्ट नावेही दिली जात.  मी शाळेत असताना ‘प्रभात’, ‘लोकमान्य’, ‘धनुर्धर’ अशी माझ्या संघाची नावे मला आठवतात. वर्षभर विविध स्पर्धांमधून या सहा संघांची चढाओढ चालू असे. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यास अशा विभागात स्पर्धा असत. वर्षाअखेरीस, या सर्व विभागातून गुणांनुक्रमे उत्कृष्ट ठरणाऱ्या संघाला  ‘चॅम्पियनशिप’ चषक दिला जात असे. नाट्यकला व सांस्कृतिक कार्यक्रमांची एक स्पर्धा होत असे. बोर्डी घोलवड व संपूर्ण परिसरातील नागरिकही तेथे हजेरी लावीत. प्रत्येक गटाला आपल्या संघाचे ‘संघचिन्ह व संघघोष’  म्हणून गीत सादर करावे लागे. मला आठवते त्याप्रमाणे या सर्व संघांची संघगीते ही गुरुवर्य दुगल सरांनी लिहून दिलेली असत. प्रत्येक संघाचा कार्यक्रम त्या गीतानेच सुरू होई. परीक्षक कार्यक्रमांचे परीक्षण करीत व क्रमवारी देत. परिसरातील सर्वांसाठी तो एक मोठा आनंदमय असा कौटुंबिक सोहळाच होता. मुलांनी सादर केलेली, दुगल सरांनी लिहिलेली संघगीते ऐकणे हा त्या सर्व कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असे. 

   त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या क्रीडा स्पर्धा ही बहुदा आमच्या शाळेच्या विस्तीर्ण मैदानावरच होत असत. त्यावेळी खेळाडूंना सांघिक शपथ देण्यासाठी त्यांनी  गावयाचे गाणे सरांनी तयार केले होते. त्या स्फूर्तीदायक गाण्याच्या काही ओळी आजही माझ्या ओठावर आहेत.

      “असावे मोकळे मैदान, समस्ता संधीही समान, जडावे प्रेम खेळांचे, वागणे शूरवीरांचे!

 झटू या नियम पाळाया, यशाचा तो असो पाया,आम्हाला ईश्वरा देई, शक्ती अन् शील फलदायी!

  विषादा कधीही ना मानू, पराभव हसूनिया झेलू. नव्हे रे नाही हे माझे, यशाचे श्रेय हे तुझे!….

आजही या गाण्याने खेळाडूंना शपथ दिली जाते किंवा कसे मला माहीत नाही.  त्या काळात एकमुखाने सर्व खेळाडू मैदानावर हे गाणे गाऊ लागले की सर्वांच्याच अंगात वीरश्री संचारत असे हे खरे!!

     दुगल सर व त्यांच्याप्रमाणेच आमच्या सर्व गुरुजनांनी या शाळेतून अनेक ख्यातकीर्त विद्यार्थी निर्माण केले .त्यांनी विविध क्षेत्रात आपला स्वतःचा व आपल्या शाळेचा लौकिक वाढविला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी श्री.अमोल पालेकर हे त्यातील एक नांव. नाट्यकलेचे प्राथमिक धडे यांनी याच शाळेत अशाच कार्यक्रमांतून घेतले आहेत. दुगल सरांविषयी आठवणी सांगताना त्यांनी म्हटले आहे…

“दहावी अकरावीच्या शिक्षणासाठी बोर्डीतील शारदाश्रमात रहावयास मी आलो. मी अभ्यासात चांगला होतो. पण मी केवळ पुस्तकी किडा बनू नये, माझे आयुष्य सर्व बाजूंनी फुलायला हवे, माझा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी माझ्या आई-वडिलांनी मला होस्टेलवर पाठविले होते. मला असे वाटते की हा त्यांचा दृष्टिकोन नक्कीच व्यापक होता. होस्टेलवर राहिल्याने मलाही जगाकडे पहायची वेगळी दृष्टी मिळाली. एक छोटे उदाहरण देतो. मी एकदा निबंध म्हणून ‘प्रवास वर्णन’ लिहिले होते. ते आमच्या शाळेतील श्री. दुगल सरांना खूप आवडले. म्हणून त्यांनी वर्गात वाचून दाखविले. नंतर ते मला म्हणाले,” ‘ऋतुचक्र’ वाचले आहेस का?” मी म्हणालो, “नाही”. मग त्यांनी विचारले,” दुर्गा भागवत हे नाव माहीत आहे का?” माझे उत्तर परत नाहीच होते. तेव्हा त्यांनी मला ग्रंथालयात जाऊन ते पुस्तक वाचायला आणि नंतर त्यावर चर्चा करायला सांगितले. प्रत्येक गोष्ट केवळ परीक्षेसाठी करायची नसते, ‘स्वतःला शोधण्यासाठी’ ही काही गोष्टी करून पहायच्या असतात, याची जाण निर्माण होण्याच्या प्रक्रियेची ती सुरुवात होती, असे मी मानतो .”

  श्री. पालेकरांची ही टिप्पणी  बोर्डी शाळा, शारदाश्रम व दुगल सर यांच्या शिक्षणाविषयक दृष्टिकोनाची जाणीव करून देते.

     सर्व ठीक चालले होते. 1962 साली श्री. साने सर मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि श्री. दुगल सरांना ज्येष्ठताक्रम आणि त्यांचे शाळेतील उत्तम काम यामुळे निश्चितच मुख्याध्यापकाची जागा मिळणार असे सर्वांना वाटत होते. आचार्य भिसे यांना देखील गोखले एज्युकेशन सोसायटी कडून त्याच निर्णयाची अपेक्षा होती. मात्र यावेळी सोसायटीने, “मुख्याध्यापक हा सोसायटीचा आजीव सेवक असला पाहिजे” असा नियम केला. दुगल सर आजीव सेवक नव्हते. त्यामुळे  त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही. आचार्यांची मध्यस्थीही कामी आली नाही. शाळेतील अनेक सहकारी शिक्षकांना हा निर्णय न पटल्याने काहींनी राजीनामे देण्याचीही तयारी केली. मात्र सरांनीच आपल्या सहकाऱ्यांना तसे न करण्याची विनंती करून आचार्यांची माफी मागून, स्वतः शाळा सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. बोर्डी हायस्कूल सरांसाठी केवळ एक शाळा नव्हती तर अनेक शिक्षण महर्षींनी आपल्या जीवननिष्ठा अर्पण करून तयार केलेले ते एक उत्तम संस्कार केंद्र होते आणि तेथे आचार्य भिसे आचार्य चित्रे ही त्यांची दोन श्रद्धास्थाने तेथे होती!! 

   बोर्डी शाळा सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरांना अनेक शाळांमधून बोलावणी येत होती. मात्र त्यांनी केळवे माहीम येथील भुवनेश किर्तने विद्यालयाची विनंती मान्य केली. कारण ते विद्यालयदेखील भुवनेश महाराज किर्तने यांचे सारख्या एका ध्येयवेढ्या शिक्षकाने काही मूल्याधिष्ठित तत्वावर उभे केले होते. सरांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. बोर्डी शाळा एका कर्तृत्ववान, निष्ठावान ध्येयवादी शिक्षकाला कायमची अंतरली एवढे खरे !!

                  केळवे माहीम येथील भुवनेश्वर कीर्तने विद्यालय

    आता मुख्याध्यापक म्हणून आपल्या संकल्पनेनुसार शाळेचे व्यवस्थापन करणे सरांना शक्य झाले होते. त्यांच्या स्वतःच्या  ‘आदर्श शाळे’ बद्दल काही निश्चित कल्पना होत्या. आपल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत, आपल्या मनाप्रमाणे मुलांची जडणघडण करण्याची संपूर्ण मुभा त्यांना आता होती. सरांनी भुवनेश कीर्तने विद्यालयाचा कायापालट केला. वाचनालय, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व अगदी शाळेची नवी ईमारत सर्व त्यांच्या मनाप्रमाणे तयार झाली. अतोनात कष्ट करावे लागले. मात्र सरांनी आपले स्वप्न पूर्ण केले. आपल्यानंतर आपले वारसदारही तयार केले. भुवनेश कीर्तने विद्यालयात त्यांनी एक नवा इतिहास रचला. मुलांचे, पालकांचे, ग्रामस्थांचे प्रेम मिळविले ! तो इतिहासही मोठा रोमांचक. 1972 साली दुगल सर भुवनेश कीर्तने विद्यालयातून सेवानिवृत्त झाले.

    दुगल सरांचे बरोबर काम केलेल्या व पुढे शाळेचे मुख्याध्यापक झालेल्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांच्याविषयी जे लिहिले आहे त्यावरून सरांनी मुख्याध्यापक म्हणून  शाळेला दिलेल्या  योगदानाची कल्पना येऊ शकते…

भुवनेश कीर्तने विद्यालयास पद्मश्री डॉ. हरिश्चंद्र पाटील यांनी भेट दिली असता काही क्षणचित्रे.

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. भा. मुं. राऊत सर म्हणतात,

“श्री. नरहर दिनकर दुगल हे आमच्या भुवनेश कीर्तने विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. ध्येयानिष्ठ कर्तव्यशील आदरणीय व्यक्तिमत्व . त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यालयाला सुस्थिती प्राप्त झाली आणि असलेल्या लौकिकात आणखी भर पडली!

    ‘विद्यालय हे विद्यादानाचे पवित्र केंद्र आहे. तेथे इतर कोणत्याही प्रकारच्या शालाबाह्य गोष्टींना वाव नाही’ अशी त्यांची धारणा होती. विद्यार्थी केंद्रस्थानी मानून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते अविरत कार्यरत राहिले. विद्यार्थी-शिक्षक-पालक आणि समाज ही त्यांच्या कामाची चौकट होती. विद्यार्थ्यांच्या बरोबर जुनियर शिक्षकांनादेखील त्यांचे मार्गदर्शन असे. शिक्षकांच्या पाठाचे निरिक्षण झाल्यानंतर त्याला ऑफिसमध्ये बोलावून मार्गदर्शक सूचना करीत असत. आपला शिक्षक एक  ‘ऊत्तम शिक्षकही’ तयार झाला पाहिजे असे त्यांना सतत वाटत असे.”

   “इंग्रजी हा सरांचा मूळ विषय. विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत ते शिकवीत असत. ज्युनिअर शिक्षकांच्या दृष्टीने, शिकविण्यास कठीण अशा या विषयाबाबतीत अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर दहावी अकरावीला इंग्रजी विषय शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आली, तेव्हा मला अडचणी वाटल्या नाहीत. ते लेखन आणि कविता करीत. ‘माझी शाळा कल्पतरू’ ही कविता आजही माझ्या स्मरणात आहे. कवि आणि नवलेखकांना  त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक प्रकल्प राबविले.’ विद्यार्थी सभा’, उपक्रम भारतीय संसदेच्या धर्तीवर राबवून, त्या माध्यमातून भवितव्यात समाजातील अनेक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी  विद्यार्थी घडवावयाचे होते. हा फार  दूरदृष्टीचा विचार होता.

  ‘किं जीर्णं तृणमत्ति मानमहतामग्रेसरः केसरी’,.( सिंह जरी म्हातारा झाला तरी तो वाळलेले गवत कधीच राहणार नाही) असे त्यांचे तात्विक विचार होते.

  विचाराचे पक्के होते. आपल्या विचारातून त्यांनी कधीच माघार घेतली नाही. गांधीवादी विचारसरणी आणि आचार्य भिसे यांचे जीवन विषयक मार्गदर्शन  या अनुसार त्यांचे आचरण असे.ते फुलझाडात रमत असत. त्यांनी आपल्या घराभोवती सुंदर बाग तयार केली होती. अनेक फुलझाडे लावली होती. माझ्या या शिक्षणाक्षेत्रातील गुरूला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करतो.”

  माहीम येथील विद्यालयात राबविलेल्या अनेक उपक्रमापैकी वृक्षारोपण हा एक महत्त्वाचा उपक्रम असे. 

 त्यांचे दुसरे एक सहकारी व पुढे शाळेचे मुख्याध्यापक झालेले श्री. परशुराम ल. पाटील सर म्हणतात,

       “श्री. दुगलसर कीर्तने विद्यालयात 1963 साली मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले. शाळेची जबाबदारी अत्यंत कठीण समयी त्यांनी स्वीकारली . ‘माझ्या दृष्टीने जेवढे चांगले काम करता येईल ते मी करीन’ अशी यावेळी त्यांची भावना होती.  एक अनुभवसंपन्न व इंग्रजी विषय शिकविण्यासाठी चांगले शिक्षक आम्हाला मिळाले .दुगल सर हे कवी मनाचे प्रेमळ आणि शिस्तप्रिय होते. त्यांचे चौकोनी कुटुंब हे आदर्श होते .त्यांच्या दोन्ही मुली परमेश्वरी देणगी लाभलेल्या होत्या. त्यांची दुसरी मुलगी(नीलोत्पला) एस. एस. सी. पास झाली तेव्हा ती बोर्डात इंग्रजी विषयात पहिली आली .तिला इंग्रजी विषयाचे ‘ कमळाबाई पारितोषिक’ मिळाले होते. त्यांची मोठी मुलगी प्रभा एम. एस. सी. झाली होती. विद्यालयाला शास्त्र शिक्षक मिळणे दुरापास्त होते, अशावेळी तिने दोन वर्षे शास्त्र शिक्षकांची जबाबदारी पार पाडली. ट्रेंड नसूनसुद्धा ती शिकवत असलेला वर्ग अगदी शांत असे. तिचा वर्ग म्हणजे एक वस्तूपाठ असे. दुगल सरांनी शाळा हलती बोलती केली. विद्यार्थ्यांचा अभ्यास, शिक्षकांचे शिकवणे, शालेय कार्यक्रम याकडे दुगल सर कटाक्षाने लक्ष देत. याशिवाय शालेतर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी उद्युक्त करीत. मासिक सभेत पुढील महिन्याचे नियोजन असे. त्यामुळे शाळेचे काम आखल्याप्रमाणे चाले. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विषयशिक्षकांनी काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन होई. जादा तासीका घेऊन अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे करून घेतला जात असे. त्यामुळे शाळेचा दर्जा वाढून एस. एस. सी. ची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली.

   दुगलसर कवी होते. त्यांनी लिहिलेली अनेक  प्रासंगीक गीते मलाआठवतात.

शाळेविषयी ते म्हणतात,

‘ माझी शाळा कल्पतरू, कुणीही येवो वाटसरू वाटसरू,’

कार्यक्रमाचे निमित्ताने कोणी पाहुणा येणार असल्यास त्यानिमित्ताने ते स्वागत गीत लिहीत व ते विद्यार्थ्यांकडून सादर करीत.

 ‘ भुवनेशाच्या ज्ञानमंदिरी, गुरुवरा स्विकारा स्वागता’ अशा स्वागत गीताच्या ओळी असत.

  लहान मुलांकरिता ते कथासंग्रह लिहित. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून दर आठवड्याला सुंदर गोष्टींची पुस्तके, पुस्तक-पेढीतून वाचावयास देत. स्वर्गीय इंदिरा गांधींनी बांगलादेशात शांतीसैनिक पाठवून बांगलादेश स्वतंत्र केला तेव्हा दुगल सरांनी

   ‘आमार सोनार बांगला..’

अशी सुंदर कविता लिहून ती विद्यार्थ्यांकडून सुरात गाऊन घेतली. विद्यार्थ्याबरोबरच शिक्षकांच्या गरजांकडेही लक्ष देत. त्यांच्या कालखंडात आम्हा तीन शिक्षकांना त्यांनी एक, एक वर्षाच्या अंतराने बी. एड. साठी पाठवून आमचे ट्रेनिंग पूर्ण करून घेतले. दुगल सरांनी विद्यालयास नऊ वर्षे सेवा दिली व दहा डिसेंबर 1972 मध्ये ते निवृत्त झाले”.  

दोन  सहकार्-यानी दिलेल्या अभिप्रायांमधून दुगल सरांची एक उत्तम प्रशासक म्हणून कार्यक्षमता, विद्यार्थी प्रेम, तरल कवी मन, निसर्ग प्रेम आणि आपल्या सहकार-या विषयीची तळमळ अशा अनेक गुणांचे दर्शन होते! 

वर:डावीकडे, दादांचा एक जुना फोटो. उजवीकडे:जयंत ,प्रभा,(मांडीवर सागर), समीर ,आई, दादा.
खाली: निलोत्पला, दादा, समीर, आई, जयप्रभा.

 भुवनेश कीर्तने  विद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर गोवा येथील ‘भाऊसाहेब बांदोडकर विद्यालयात रुजू झाले. केळवे माहीम शाळेत असतानाच कधीतरी एकदा साहित्य संमेलनात त्यांची गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी गाठ पडली होती. त्यावेळी सरांनी निवृत्तीनंतर आपल्या शाळेत यावे अशी इच्छा भाऊसाहेबांनी प्रदर्शित केली होती. सरांचे व्यक्तिमत्व व त्यांची गुणवत्ता भाऊसाहेबांनी बरोबर हेरली होती. 

       गोव्यातही त्यांनी  उत्तम प्रकारे काम केले. शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुरू होता. मात्र दुर्दैवाने भाऊसाहेबांचे अकाली निधन झाले. सरांनी गोवा  सोडले. कोल्हापूरला आपल्या बंधूच्या शेजारी एक घर भाड्याने घेऊन त्यांनी तेथे मुक्काम केला. तेथे स्वस्थ बसले नाहीत. आपल्या आवडीचा लेखनाचा छंद जपण्यासाठी भरपूर वेळ मिळू लागला.

           कै.दुगल सरांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे.

 ‘कुमार पुष्पक’ हा काव्यसंग्रह बराच जुना. बोर्डीत असताना प्रसिद्ध झाला. त्याच्या सर्व प्रती भराभर संपल्या. ‘मंगलवाडी’ ही कुमारांसाठी असलेली  कादंबरीका बोर्डीत  असताना प्रकाशित झाली. त्याच्याही अनेक आवृत्त्या  निघाल्या.  ‘मंतरलेली तलवार’, ही नाटिका आकाशवाणीवर सादर झाली. ‘आधुनिक सांदीपनी आश्रम’, ‘समीर पाहिला कुणी?’, ‘गुलाबी कावळा’, ‘सॅमी हॅमि’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके! दुगल सरांचे अनेक लेख कथा आणि काव्य त्याकाळी प्रसाद, शालापत्रक, अशा मासिकामधून प्रसिद्ध होत असत.

   “आपले वांग्डमय आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे ते माफक किमतीत उपलब्ध व्हावे” अशी त्यांची आपल्या प्रकाशकांना विनंती असे. मात्र प्रकाशकांचे ‘नफा’ हेच उद्दिष्ट असल्याने सरांनी आपली स्वतःची प्रकाशन संस्था ‘बाल कुमार साहित्य सरिता’  निर्माण केली. आपली पुस्तके अत्यंत माफक दरात मुलांसाठी उपलब्ध करून दिली. स्वतः खोट खाऊन हा उद्योग त्यांनी सुरू केला होता. त्यांचे एक  शिष्योत्तम श्री. अमोल पालेकर, श्री. पणशीकर यांनी याबाबतीत सरांना खूपच सहाय्य केल्याचे मला समजले. शेवटी आर्थिक नुकसानीतील हा उद्योग जास्त काळ चालू शकला नाही. सरांसाठी ही खूप वेदनादायक घटना होती मात्र त्यांचा नाईलाज होता.

     त्या वयातही वितरणासाठी त्यांनी साध्या एसटी बस मधून अनेक गावोगावी प्रवास केला. त्यांच्या तब्येतीला बराच त्रासही झाला .पण हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने ते थांबले नाहीत.

  ‘मंगल वाडी’ या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत आपल्याआजी विषयी व गुरुवर्याविषयी व्यक्त केलेले भाव त्यांच्या शब्दात ….

“कै. सौ. गं. भा. माईस ..

   गंगा भागीरथीप्रमाणेच धवल निर्मल होतीस तू . अंतर बाह्य परमपवित्र होते तुझे चरित्र आणि चारित्र्य. तुझ्या त्यागाला, सेवेला ,निरलसतेला  सीमा नव्हती. आप-परभावाचा तुला स्पर्शही नसल्यामुळे सावत्र मुलाच्या मुलांची,  सख्याआजी पेक्षाही जास्त मायेने काळजी घेतलीस तू. तूच आमच्यामध्ये सात्विक भाव निर्माण केलेस .

  तुझ्या पवित्र स्मृतीला तुझा बाळू आपली ‘मंगलवाडी’ प्रेमाने अर्पण करीत आहे.

  शिक्षणक्षेत्रातील माझे आदर्श पूज्य कै. आचार्य भिसे व पूज्य श्री. चित्रे गुरुजी या थोर विभूतींना मंगलवाडीची  तिसरी आवृत्ती प्रेमादरपूर्वक अर्पण करीत आहे.”

     आपले बालपण , त्यावेळची कौटुंबिक स्थिती, शिक्षणकालात करावे लागलेले कष्ट स्वातंत्र्याच्या प्रेरणेने विद्यार्थीदशेतील धडपड, स्वातंत्र्यवीर सावरकराविषयी असलेला जाज्वल्य अभिमान व शेवटी त्यांची झालेली भेट याविषयी सरांनी स्वतःच एके ठिकाणी लिहून ठेवले आहे ते म्हणतात..

   “माझे वडील क्रांतिकारकांच्या ‘अभिनव भारत’ मध्ये होते. आमच्या घरातल्या एका गुप्त जागी तलवारी, भालेबरच्या, एक बंदूक अशी आमच्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे होती. खंडे नवमीला आम्ही त्यांची पूजा करायचो.”

 ” कुमार वयांत माझ्या हाती सावरकरांचे मॅझिनीचे पुस्तक लागले. पुस्तक वाचून संपवले तेव्हा मी अगदी भारावला गेलो होतो.पुस्तकाची प्रस्तावना मी तोंड पाठ केली. सावरकरां बद्दलच्या चित्त थरारक गोष्टी ऐकणे व सोबत्यांना सांगणे हा माझा छंद होता. ब्रिटिश सरकारची नोकरी करावयाची नाही, अशी शपथ मी घेतली अगदी कुमार वयात!”

  “देशभक्तीपर गाणी गात प्रभात फेऱ्या काढणे, दारू दुकानावर निरोधन करणे, गांधी टोपी घालणे, इंग्रजी सरकार विरुद्ध बोलणे लिहिणे, याबद्दल हेडमास्तरांकडून दोन्ही हातावर छड्या खाल्ल्या. पोलिसांच्या दंडुक्यांचा व बंदुकीच्या दस्त्यांचा प्रसाद ही खाल्ला. तरी ‘लेंगे स्वराज्य लेंगे’ म्हणत झुंजत राहिलो.  सतत पहिल्या प्रतीचे यश मिळवून पदवी संपादन केली. थकलेल्या वडिलांच्या शिरावरची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली. ती पार पाडण्यासाठी अर्थार्जन करणे आवश्यक होते.”

    “मी गोमांतकात खाजगी विद्यालयात शिक्षक म्हणून जाण्याचे ठरविले. त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्थानबद्धेतून सुटका होऊन ते मुंबईत दादर भागातल्या ‘भास्कर भुवना’मध्ये आलेले ऐकताच अंगात वीज सळसळून गेली. गोव्याला जाण्यापूर्वी त्यांची भेट घ्यायचीच असे माझ्या मनाने घेतले. त्या दिवशी पहाटे उठून मी दादरचा समुद्र किनारा गाठला. ‘भास्कर भुवन’चा जिना चढून वर जाताच बाबाराव सावरकर भेटले. त्यांना माझा येण्याचा हेतू सांगताच ते म्हणाले, “तात्याची तब्येत ठीक नाही, डॉक्टरांनी त्याला भेटी-गाठी बंद केल्यात”. माझ्या वडिलांची व माझी थोडक्यात माहिती दिली. ते विरघळले आणि म्हणाले, “थांब मी बघून येतो!”

  “थोड्या वेळाने बाहेर येऊन ते म्हणाले, “दुगल तुम्ही भाग्यवान आहात. तात्या येत आहेत”. तेथेच आनंदाच्या आवेगात मी उठून उभा राहिलो. तो समोरच मनोमनी पूजिलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी मूर्ती! त्या भावदर्शी अवर्णनीय नेत्रांनी सारं अंग रोमांचित होऊन मी खाली वाकून नमस्कार केला. त्या पवित्र चरणांचा स्पर्श माझ्या हातांना होतोय तोच तात्यांनी आपल्या हातांनी मला उठवून आपल्या जवळ बसवून घेतले. माझी पाठ थोपटून ते म्हणाले, ‘असेच तुझ्यासारखे आणखी ध्येयवेडे तयार कर. तू गोमांतकात शिक्षण कार्य करायला जातोस हे ऐकून मला आनंद झाला’ असे म्हणून त्याबाबतीत त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी मला सांगितल्या. त्यांचे स्फूर्तीदायी शब्द माझ्या अंतःकरणावर कोरले गेले”.

   ज्या शब्दात  सरांनी स्वातंत्र्यवीरांशी झालेल्या पहिल्या भेटीचे वर्णन केले आहे ते वाचून आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात! तात्यांना दिलेले वचन सरांनी अखेरपर्यंत पाळले.

   सरांच्या धर्मपत्नी कै. सौ. ललिता दुगल यादेखील पदवीधर होत्या. मॅट्रिकच्या परीक्षेत त्या पूर्ण गोव्यात प्रथम आल्या होत्या. विणकाम भरतकाम रांगोळी काढणे यातही त्या अत्यंत पारंगत होत्या. अत्यंत रुचकर पदार्थ बनवणे हा त्यांचा छंद होता. अनेक स्पर्धांमधून त्यांनी बक्षीसेही मिळविली होती. दादांच्या पुस्तकांचे हस्तलिखित तयार करण्यात त्यांचीच मोठी मदत असे. कै. सौ. ललिता बाईंनी बोर्डीत आल्यावर कै. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे विकासवाडी संस्थेत अध्यापनाचे कार्य केले. त्या संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण देत असत. पुढे त्यांनी हिंदीच्या परीक्षा देऊन तो विषयही तेथील शिक्षकांना शिकविला. अशा कर्तृत्ववान, हुशार, व  संसारासाठी  स्वतःच्या कर्तृत्वाला आवर  घालून पतीला सर्व प्रकारे  सहाय्यभूत ठरलेल्या अर्धांगिनीमुळे सरांचे संसारिक जीवन निश्चितच यशस्वी झाले! कै.ललिता दुगल यांच्या कर्तृत्वाला सलाम ! त्यांच्या स्मृतीला वंदन!!

     सरांच्या सर्वात धाकट्या बंधूनी आपल्या दादाविषयी जे सांगितले आहे त्यावरून दादां व ललिता ताईंनी या संपूर्ण कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, उभयतांनी दिलेले संपूर्ण योगदान व त्याची  कुटुंबीयांना असलेली जाणीव याचे दर्शन घडते. ते म्हणतात,

   ” ‘Today, for the second time, I experienced the loss of my father..’, Shashi Kapoor said when Raj Kapoor died. My feelings were no different when I lost my eldest brother, Dada.

    From my early childhood, I observed him shouldering the responsibility of our large family with my siblings and my old father, but never grudging it or even making us aware that his own career and prospects were being sacrificed for it.”

   ” Having suffered immense hardships and hard work for his own education till graduation, he protected us from going through the same ordeal till completion of our college education.  One of my brothers had opted for the arts course due to our economic condition, but Dada knew his potential and made him join the science branch; he became a successful doctor.”

   ” During all these years, we did not even realize what great support he had given us. He was fortunate to have a wife who, having come from a well-to-do family, never grumbled about the compromise she had to make for our family. Both of them treated us with love and consideration, as any  parents  would do for their children.”

    ” He was an ardent supporter of women’s liberation and women’s rights. He used to be highly critical of traditional customs and beliefs, which, according to him, were based on blind faith and often ignorance. At the same time, he was a worshiper of values like loyalty, integrity, honesty, and high moral standards. He was secular to the core, and religious or casteist fanaticism was anathema to him. An excellent teacher, he took pains to make students aware of the finer points in the subject he taught. He was fastidious about neatness  and cleanliness and always insisted on being punctual in every activity or program, “

    ” He was a Puritan in his tastes and Spartan in his lifestyle. He never compromised with his principles; he hated a casual and easygoing approach to life”.

   दादांच्या बंधूंची प्रतिक्रिया मुद्दाम इंग्रजीत दिली आहे, आदर भावना व बंधुप्रेमाचे दर्शन त्यांच्याच शब्दात व्हावे म्हणून!

  ” दादा व वहिनीने आम्हा सर्वांचे, आई-वडील आपल्या मुलांचे संगोपन ज्या  प्रेमाने करतील  तसे केले..” या शब्दातच सर्व काही आले!

       दुगल दांपत्याला दोन कन्या. मोठी जयप्रभा व छोटी नीलोत्पला. जयप्रभाने एम. एस. सी. केल्यानंतर काही काल भुवनेश कीर्तने विद्यालयात  उत्तम प्रकारे शिक्षकी पेशा केल्याचे मागे आलेले आहे. पुढे अमेरिकेत एम एस चा अभ्यास करीत असतानाच श्री. जयंतराव सरदेशपांडे या उच्चशिक्षित (M S, USA) तरुणाशी तिचा विवाह होऊन, अमेरिका सोडून दोघांनीही काही काळ( Montrial) कॅनडात वास्तव्य केले. आता हे कुटुंब गेली तीस वर्षे इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. जयंतरावांचा स्वतःचा व्यवसाय तेथे आहे. मोठा मुलगा समीर ऑक्सफर्ड व कॉर्नेल (युएसए) या विद्यापीठातून उच्चशिक्षित झाला आहे. तो कॅनडामध्ये वास्तव्यास असतो . या मंडळीचे आपल्या व्यवसायाबरोबर समाजकार्य ही जोरात सुरू असते. अपंग मुलांना शिक्षणात मदत, कॅन्सर संशोधन संस्थेला सहकार्य, तसेच काही इतर सामाजिक संस्थांसाठी निधी उभारण्याचे कामही हे दोघे करतात. धाकटा सागर उच्च शिक्षणानंतर( M S, पेनसिल्वानिया)  इंग्लंडमध्येच स्थित असून ‘अॅपल’ कंपनीत काम करीत असतो.

  सरांची  धाकटी कन्या नीलोत्पला, एम्. फिल होऊन तिचा विवाह श्री. सुभाष पुरव यांचे बरोबर झाला आहे. श्री. सुभाष हे पेशाने मरीन इंजिनियर असून आता दोघेही पुण्यात निवृत्तीचे जीवन जगत आहेत. त्यांचा मोठा मुलगा आशिष अमेरिकेत उच्च शिक्षित असून तेथेच मोठ्या पदावर नोकरी करीत असतो. मुलगी चिकीता अमेरिकेतील एम. एस. शिक्षणानंतर भारतात परतली आहे. आपल्या आजोबांच्या समाजकार्याचा वसा घेऊन पुण्यात तिचे समाजकार्य चालू आहे. महानगरपालिका शाळेतील गरीब मुलांसाठी तिने दोन वर्षे अध्यापन केले, एका सामाजिक कर्तव्याच्या  भावनेने! आजही कित्येक  विद्यार्थी अडचणीच्या प्रसंगी तिचा सल्ला घेतात व त्यांना मदत मिळते. सर्वात लहान कन्या शब्दुली, एम बी ए  नंतर अमेरिकेतच वास्तव्यास असते. आजोबांचे कवित्व गुण  तिच्यात उतरले असून छान कविता करते.

     ही मुले जेव्हा  लहान होती तेव्हा दादांच्या, 

  ” शृंग जिंकिले आम्ही, एव्हरेस्ट बापुडे..

    तेनसिंग संगती आम्ही चाललो पुढे…”हे संघगीत म्हणत जोरात  ‘मार्च’ करीत हा त्यांचा खूप आवडता खेळ होता!

   गौरवाची बाब म्हणजे या सर्व मुलांनी व नातवंडांनी आपले प्राथमिक ते परदेशातील उच्च शिक्षण  बहुतांशी स्कॉलरशीपस् वर, केले आहे. आणि एवढ्या उच्च शिक्षणानंतर  समाजकार्यातही  उत्साह दाखवीत असतात. कै. दुगल सरांचा वारसा सर्वजण सर्वार्थाने पुढे चालवित आहेत.

सरांनी कुमारासाठी लिहिलेल्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे. ही सर्व पुस्तके बोर्डी  शाळेच्या वाचनालयात आहेत.

ज्येष्ठ कन्या जयप्रभा तिने इंग्लंडहून आपल्या दादां बद्दल हे लिहून पाठविले..

  “ He named me Jayaprabha, the light of victory, and my younger sister a blue lotus. I am so proud of my poetic father. When we shifted to Bordi, I was about three years old. Dada and I had chosen a house that was right on the seashore. There was a huge Suru tree garden in front of our house, and then the sea shore walking on the deserted C sure and little me enjoyed walking and talking with him on the shore walk. Dada, the nature lover, named my sons Sameer and Sagar when I first visited India after moving to Canada. My son Sameer was only one and a half years old. He was fond of the grandparents he called Dada Abo for Ajuba and soon picked up the word Venice to show him bright Venus in the evening sky.

   समीर दादांना एवढा बिलगला होता की आम्ही कॅनडाला परत जायला निघालो तेव्हा आबू बरोबर नाही हे लक्षात आल्यावर समीरने रडून रडून इतका आकांत केला की एअर लाईन्सचा एक ऑफिसर बाहेर येऊन आबू कोण आहेत म्हणून अबोना शोधून आत घेऊन आला तेव्हाच समीर शांत झाला   

     Dada visited us in Montreal, Canada. They also traveled to New York and Washington. They enjoyed visiting the historical places. Dada had an open mind and was ready to listen to different ideas and views. From people living a different way of life, his grandchildren are very attached to him and can chit-chat with him freely and confidently. a

Abo imbibed a love for nature in his grandchildren.

   कॅनडा ट्रिप बद्दल दादांनी लिहिले आहे प्रभाकडे कॅनडात घालविलेले दिवस हे माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे शांततेचे आणि समाधानाची दिवस होते

 या लेखासाठी कौटुंबिक व इतर माहिती मला नीलोत्पला ताई कडूनच मिळाली.  त्यामुळेच हा लेख लिहणे मला शक्य झाले आहे. पुरव दांपत्याचा संपर्क माझे मित्र के. माहीमचे श्री. अनिल पाटील यांच्यामुळे होऊ शकला. म्हणून अनिलचे मला आभार मानले पाहिजेत.

    नीलोत्पला ताईंनी आपल्या दादाविषयी सांगितलेली बोर्डीच्या बालपणातील एक आठवण मला खूपच हृदयस्पर्शी वाटली, ती त्यांच्या शब्दातच सांगतो..

“बोर्डीच्या मुक्कामात मी चार-पाच वर्षाची असेन. मात्र दादांचा रोजचा जीवनक्रम मला अजूनही आठवतो. पहाटेचे साडेतीन-चार वाजताच त्यांना जाग येई. नित्य कर्मै आटोपून आपल्या प्रार्थना हळू आवाजात म्हणत. उपनिषदांतील, ‘इशा वास्यम्  ईदं सर्वम्… ‘ या वचनाने सुरू होई. भगवद्गीतेतील श्लोक ,पसायदान  म्हणत, छान आवाजात आपल्या कविताही म्हणत ,शेवटी ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा ..’,ही भूपाळी होत असे.आमच्या घराला बाहेरून असणाऱ्या लाकडी चौकट्यातून दिसणारा निसर्ग पाहायला मला खूप गंमत वाटे. मीही बाबांचा आवाज ऐकून कधी कधी पहाटेस उठून त्यांच्या बाजूला बसून ते सर्व ऐकत असे. बाहेरील  शांत वातावरण, समोरच्या समुद्राची हळू आवाजातील गाज व दादांच्या मंजुळ आवाजातील प्रार्थना मला मंत्रमुग्ध करीत. हे सर्व वातावरणच जादुई  होते .आजही त्या दिवसांची आठवण झाली म्हणजे, प्रार्थना करणारे दादा व त्यांच्या शेजारी हात जोडून बसलेली मी, असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर येते…!” 

    ” दादांचा  स्वच्छता व टापटीप  याबाबत विशेष कटाक्ष असे. नेहमी खादीचे  कपडे साधी राहणी असे. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे चारला उठणे कधीही चुकले नाही. कधीतरी लवकर ही उठत. त्यानंतर रोजची प्रार्थना, व्यायाम, चालणे हेही होतच असे. वक्तशीरपणा त्यांच्या रक्तातच होता. समुद्राचे त्यांना विशेष आकर्षण होते.  त्याला ते ‘माझा सागर सखा’ असे म्हणत. वेळ मिळाल्यास संध्याकाळी समुद्राच्या वाळूवर फे-या घालताना आपली आवडती गाणी  गुणगुणत. त्यांच्या एका नातवाचे नाव सागर आहे! आकाशदर्शनातही त्यांना खूप आनंद होई. आपल्या मुलांना ,नातवंडांना त्याची माहिती करून देत. 

त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज दिसून येई. ते जेथे जात तेथे त्यांची छाप पडत असे. परदेशात गेले असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने तेथील लोकांनाही त्यांचे वेगळेपण जाणवले”

  ” ते कलासक्त होते. संगीताची  विशेष आवड होती. प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री होती. बालनाट्य प्रणेत्या श्रीमती  सुधा करमरकर यांचादेखील आमच्या कुटुंबाशी चांगला परिचय होता. पुण्यात राहायला आल्यावर दादांचे आवडते लेखक गो. नी. दांडेकर यांना भेटायला ते गेले होते. गो. नी. दांच्या कन्या प्रसिद्ध लेखिका, वीणा देव या त्यांच्या दोन्ही कन्यांना घेऊन दादांना भेटण्यासाठी आमच्या घरी आल्या होत्या. दादा गेल्यानंतर त्या आईला भेटायला आल्या व म्हणाल्या

       “इतक्या थोड्या वेळात, एक दोन भेटीत दादांनी केवढी माया मला दिली. किती आपुलकी निर्माण केली!” कला क्षेत्रातील अनेक व्यक्तींशी दादांनी वैयक्तिक मैत्रीचे संबंध स्थापित केले होते.”

    “आचार्य विनोबा आणि जयप्रकाश नारायण या विचारवंताबद्दल दादांना अत्यंत आदर होता. भूदान चळवळीला त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता. ते वर्ध्याला पवनार आश्रमात विनोबाजींना भेटूनही आले होते. विनोबाजींचे अभ्यासपूर्ण चरित्र दादांनी लिहिले आहे, परंतु ते अप्रकाशीत राहिले. आमच्या घरात शेकड्यांनी पुस्तके होती. उपनिषदे, ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरील टीका, गीता रहस्य, लोकमान्य टिळक, गांधी विनोबाजी, सावरकर रवींद्रनाथ टागोर ,गो नि दा अशांची मराठी इंग्रजीतील पुस्तके होती. दादा पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचत. पुस्तकांचा संग्रह करणे हा त्यांच्या छंद होता. तीच आमच्या घरातील मोठी संपत्ती होती. आम्हाला सर्वांना वाढदिवसाला पुस्तकेच भेट मिळत असत.”

   कन्येच्या या आठवणीतून दुगल सरांच्या कलासक्त, शिस्तप्रिय  व्यक्तिमत्त्वाचा व एक प्रेमळ कुटुंब प्रमुख म्हणून परिचय होतो !

   गोव्यातील कार्यकाल आटोपल्यानंतर दुगल सर कोल्हापूर येथे आपल्या धाकट्या भावाच्या घराशेजारी रहावयास आले. तेथेच लेखन ,वाचन हे आपले आवडीचे छंद जोपासत राहू लागले. तेथून पुण्या मुंबईत व प्रभाकडे कॅनडात  त्यांच्या फेऱ्या होत असत. आपल्या दोन्ही कन्यांचे त्यांना खूप कौतुक होते. दोघींनाही त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्यास, व्यवसाय करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. घरातील वातावरण नेहमी आनंदी समाधानी असे. 1991 साली पुण्यात आपल्या कन्येच्या घराशेजारी ते रहावयास आले.1993मध्ये त्यांची प्रकृती बिघडली. अवघ्या काही दिवसातच त्यांचे दुःखद निधन झाले. ती तारीख होती 23 एप्रिल 1993.. त्यादिवशी एका आदर्श ध्येयवादी शिक्षकाचे, समर्पित उज्वल, निष्कलंक जीवन संपले!!

   संपूर्ण आयुष्यभर जगाचे भलेबुरे अनुभव घेत घेत ,आयुष्याकडे निर्लेप सकारात्मक दृष्टीने कसे बघावे, आपल्याजवळ देण्यासारखे जे असेल ते सतत कसे देत राहावे, याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे दुगल सरांचे जीवन होते! त्यांच्याबद्दल अनेकांना एक प्रेम आदरयुक्त दरारा असे. 

       “सत्यास ठाव देई । वृत्तीस ठेवि न्यायी ।  सत्यास मानि राजा …”

  अशा जीवन-मूल्यांचे पालन करीत, स्वतः आनंदी राहून जगावर आनंदाची बरसात  करणाऱ्या, आयुष्यभर स्वानंदी वृत्ती जपणाऱ्या आमच्या कै. न. दि. दुगल सरांच्या स्मृतीला  वंदन करून इथे थांबतो.

दिगंबर वा राऊत.